Suresh Dhas : “मी उलटा फिरलो तर तुम्हालाही…”; सुरेश धसांचा आक्रमक पवित्रा, जयंत पाटलांना थेट आव्हान
Suresh Dhas : त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Suresh Dhas : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना थेट इशारा दिला आहे. “जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी सहज डिवचायचा माणूस नाही. मी उलटा फिरलो तर तुम्हालाही नीट सोडणार नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तुमच्या भागात चालवा, बीडमध्ये नाही,” अशा रोखठोक शब्दांत सुरेश धस यांनी जयतं पाटलांना आव्हान दिले.
बीडमधील मच्छिंद्रनाथ गडावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुधाच्या दरासह विविध मुद्द्यांवर जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सुरेश धस आक्रमक
जयंत पाटील यांच्यावर टीका करताना धस म्हणाले, “तुम्हाला पाहून इतर लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. देवाने तुम्हाला जितकं डोकं दिलं आहे, त्यापेक्षा एक टक्का जास्त आम्हालाही दिलं आहे. तुम्ही आमच्या भागात येऊन आम्हाला डिवचत असाल, तर आम्हीही तुमच्या भागात येऊन उत्तर देऊ.” अशा आक्रमक शैलीत धसांनी जयंत पाटलांना थेट इशारा दिला.
हेही वाचा : Muzammil Ibrahim : दीपिकासोबतच्या नात्याच्या दाव्यावरून गदारोळ; अखेर मुजम्मिल इब्राहिमने तोडले मौन
पुढील अधिवेशनानत पहिल्याच दिवशी….
सुरेश धस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाच्या कारभारावरही गंभीर आरोप केले. “मविआ सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री कोण होते, हे सर्वांना माहिती आहे. त्याच काळात ‘जिओ टॅगिंग’चा शासन निर्णय काढण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. याबाबतची संपूर्ण माहिती मी पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मांडणार.” असेही धसांनी म्हटलं आहे.
धसांकडून महालक्ष्मी संस्थेचा उल्लेख
‘महालक्ष्मी’ नावाच्या एका संस्थेचा उल्लेख करत सुरेश धस यांनी आणखी काही मोठे खुलासे करण्याचे संकेत दिले. ही संस्था नेमकी कोणाची आहे, तिची नोंदणी कोणाच्या नावावर झाली आहे, संस्थेत कोणाचा किती हिस्सा आहे आणि तिचे संचालक कोण आहेत, यासंबंधीची सविस्तर माहिती आपण विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मांडणार असल्याचा दावा त्यांनी केला.
जयंत पाटील काय प्रत्युत्तर देणार?
सुरेश धस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आगामी विधिमंडळ अधिवेशनात ‘जिओ टॅगिंग’ आणि ‘महालक्ष्मी’ संस्थेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. धस यांनी केलेले आरोप आणि मोठे दावे यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय प्रत्युत्तर देतात, तसेच या आरोपांवर कोणती भूमिका मांडतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






