शिरूर – शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यांचं सत्र वाढतच आहे. अशाच एका घटनेत सविंदणे गावात 26 मार्च रोजी पहाटे बिबट्याने शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला करून त्याला ठार केलं. पण नुकसान भरपाईसाठी पंचनामा करण्यापूर्वी शेतकऱ्याला सविंदण्याहून थेट शिरूरच्या वनविभाग कार्यालयात अर्ज घेऊन येण्याचा अजब निर्णय वनविभागाने घेतला आहे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि संताप पसरला आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश: “पंचनामा गावातच का नाही?” पीडित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, बिबट्याच्या हल्ल्यांमुळे आधीच आर्थिक नुकसान सोसावं लागतंय, त्यात आता पंचनाम्यासाठी शिरूरला जाण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतोय. वनविभागाने गावातच येऊन पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे, “घटना गावात घडते, मग पंचनामा कार्यालयात का?” या नव्या जाचक नियमामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्रास वाढला आहे. पंचनामा संबंधित शेतकऱ्याच्या गावातच येवून करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बिबट्याचा धुमाकूळ, वनविभागाची उदासीनता- शिरूर तालुका मोठा असून, काठापूर बु. (40 किमी), तांदळी (40 किमी), कोरेगाव भीमा (35 किमी) ही गावं शिरूरपासून दूर आहेत. या भागात बिबट्याने शेकडो पाळीव प्राणी ठार केले असून, लहान मुलांवर आणि माणसांवरही जीवघेणे हल्ले केले आहेत. यापूर्वी फोनवर माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा करत होते. पण आता कार्यालयात लेखी अर्ज द्यावा, अन्यथा ईमेल किंवा व्हॉट्सअॅपवर माहिती पाठवावी, असा नवा नियम लागू झालाय. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि या जाचक अटींमुळे शेतकरी आणि मेंढपाळ हवालदिल झाले आहेत. वनविभाग अधिकारी काय म्हणाले? वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे म्हणाले, “बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन मृत्यूमुखी पडल्यास शेतकऱ्यांनी फक्त फोनवर माहिती देऊ नये, तर लेखी अर्ज कार्यालयात सादर करावा. अर्ज प्रत्यक्ष देणं शक्य नसल्यास ईमेल किंवा व्हॉट्सअॅपवर पाठवावा. त्यानंतरच कर्मचारी पंचनाम्यासाठी येतील.” शेतकऱ्यांची मागणी – शेतकरी संघटनांनी वनविभागाला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या नव्या नियमाने आणखी त्रास सहन करावा लागतोय. वनविभागाच्या या धोरणाविरोधात संतापाची लाट उसळली असून, याबाबत त्वरित बदल अपेक्षित आहेत.