Junnar News – जुन्नर तालुक्यातील आणे आणि पेमदरा परिसरात रविवारी (दि. २९) दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन असताना अचानक सुटलेला वारा आणि गारांच्या वर्षावामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काही ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, काढणीला आलेल्या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस सुरू झाला तेव्हा अनेक शेतांमध्ये वटाणा तोडणी आणि कांदा काढणीची कामे सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे काढलेला माल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. गारांचा मारा आणि साचलेल्या पाण्यामुळे वटाणा व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते आणि पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर यांनी कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी साठवणुकीचा प्रश्न गंभीर झाला असून, पावसामुळे कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवस वातावरणात असाच बदल राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तातडीने ओला दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत द्यावी, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.