महिला विश्वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा
केपटाऊन – आयसीसीच्या महिला विश्वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज (बुधवार,7.00 वाजता) भारत व वेस्ट इंडीज यांच्यात लढत होत आहे. सलामीच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे भारतीय संघ भरात असल्याने त्यांचेच पारडे या सामन्यात जड राहणार आहे. या स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेतच पार पडलेल्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर वर्चस्व राखले असल्याने या सामन्यात जर विजय मिळवायचा असेल तर वेस्ट इंडीजच्या संघाला केवळ चांगली गोलंदाजी करुन चालणार नाही तर फलंदाजी करताना भारताच्या सक्षम फिरकी गोलंदाजीचाही समर्थपणे सामना करावा लागणार आहे.
विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न घेऊन येथे दाखल झालेल्या भारतीय संघाने सराव कसून केला व त्याचा दाखला सलामीच्याच लढतीत पाकिस्तानचा सहज पराभव करत सिद्धही केला. या सामन्यात पाकिस्तानने उभारलेल्या 149 धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय महिलांनी कमालीची सरस कामगिरी केली व 7 गडी राखून विजय मिळवला. आता वेस्ट इंडीजचाही पराभव केला तर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. भारतीय संघाला या सामन्यानंतर रविवारी इंग्लंडविरुद्ध तर सोमवारी आयर्लंडशी लढत खेळायची आहे. त्यात इंग्लंडविरुद्धची लढत चांगलीच रगेल मात्र, वेस्ट इंडीज व आयर्लंडचा पराभव केला तर भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे. त्यामुळेच हा सामना भारतीय संघासाठी निश्चितच महत्वाचा आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडीजबाबत बोलायचे तर त्यांना अद्याप भारतीय फिरकी गोलंदाजीचा सामनाच करता आलेला नाही. तिरंगी मालिकेतही त्यांच्या फलंदाजांना ही गोलंदाजी खेळण्यात साफ अपयश आले आहे. मात्र, तरीही त्यांना कमी लेखून चालणार नाही. या स्पर्धेत त्यांना सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला असल्याने भारताविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर ते या सामन्यात पराभूत झाले तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात येण्याचा धोका आहे.
दक्षिण आफ्रिकेची न्यूझीलंडवर मात
या स्पर्धेतील साखळी लढतीत यजमान दक्षिण आफ्रिका महिला संघाने न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला व स्पर्धेत विजयी आगेकूच केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघ केवळ 132 धावाच करू शकला होता. मात्र, गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर त्यांनी न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडचा डाव अवघ्या 67 धावांवर संपला
स्मृतीकडे राहणार लक्ष
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हीची कामगिरी कशी होते याकडे लक्ष राहणार आहे. पहिल्याच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ती खेळू शकली नव्हती. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्ध तीच्या खेळण्याची शक्यता बळावली आहे. त्यातच सोमवारी महिलांच्या आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंच्या लिलावात तीलाच सर्वाधिक बोली लावत रॉयल चॅलेंजर बंगळुरुने आपल्याकडे गेतल्याने या आनंदाच्या वृत्तानंतर तीची खेळी कशी होते यावर संघालाही दिलासा मिळणार आहे. अर्थात नेटमध्ये तीने कसून सराव केल्यामुळे तीच्यावर लक्ष राहणार आहे.