India vs Pakistan : क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! भारत-पाक सामन्यांबाबत ICC चा मास्टरप्लॅन, दरवर्षी रंगणार मॅचेस
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांंच्यात मर्यादीत षटकांचे सामने पुन्हा सुरू करण्याचा आराखडा तयार केला जात आहे.

ICC Masterplan India vs Pakistan Tri Series Neutral Venues White Ball Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात हायव्होल्टेज लढत मानल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसी एका मोठ्या आणि ऐतिहासिक योजनेवर काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी आणि एसीसीच्या (ACC) स्पर्धांपलीकडे जाऊन या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये मर्यादीत षटकांचे सामने पुन्हा सुरू करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. यासाठी तटस्थ ठिकाणी (Neutral Venue) तीन किंवा चार देशांचा समावेश असलेली ट्राय-सीरिज किंवा क्वाड्रँग्युलर टूर्नामेंट आयोजित करण्याचा आयसीसीचा विचार आहे.
दुबईतील २२-२३ सप्टेंबरच्या बैठकीत प्रस्ताव; १२ कसोटी देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार!
दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळवली गेलेली नाही. मात्र, बहुराष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून या दोन्ही संघांना मैदानात आमनेसामने आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, आयसीसी २२ आणि २३ सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या ‘फ्युचर टूर्स प्रोग्राम’च्या (FTP) महत्त्वाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडणार आहे. या सेमिनारमध्ये १२ कसोटी खेळणारे देश आणि ८ असोसिएट देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
२०१२-१३ नंतर द्विपक्षीय मालिका बंद; चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपणार?
🚨 PCB-ICC EYE PAKISTAN-INDIA MULTI-NATION SERIES.🚨(ARY News)
– PCB has proposed a tri-series/four-nation tournament with India for years.
– The idea could be discussed at the ICC’s FTP seminar in Dubai on Sept 22-23.
– Multi-nation series could generate stronger commercial &… pic.twitter.com/EVDMyTFWgj
— Rana Ahmad. (@AhmadRana056) September 5, 2026
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी किंवा आशिया चषक स्पर्धा वगळता शेवटची द्विपक्षीय मालिका जानेवारी २०१३ मध्ये झाली होती. त्यावेळी पाकिस्तान संघ २ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर दोन्ही संघ केवळ विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषकातच एकमेकांसमोर आले आहेत. जर आयसीसीचा हा मास्टरप्लॅन यशस्वी ठरला, तर चाहत्यांना वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील महासंग्राम अनुभवता येईल.
सरकारी मंजुरीची अडचण नाही; युएई, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया शर्यतीत –
भारत सरकार सहसा पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिकेला परवानगी देत नाही; परंतु बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यावर कोणताही आक्षेप नसतो. त्यामुळे ३ किंवा ४ देशांची मालिका हा सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. ब्रॉडकास्टर्स आणि प्रायोजकांसाठी ही पर्वणी ठरणार असल्याने या भव्य आयोजनासाठी युएई, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तटस्थ देश सर्वात आघाडीवर आहेत.





