Pratap Sarnaik – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिव जिल्ह्यात सत्तास्थापनेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. सत्ता महत्त्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले आहेत. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून काहीजणांकडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नसल्याचे सरनाईकांनी यांनी म्हटले आहे. तसेच, आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड नाही. दबाव, आमिष किंवा अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नसल्याचा ठाम विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.