Sukanya Mone : ‘बाई गेल्या.. असा विजय केंकरेंचा फोन आला आणि…”; ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने भावूक
Sukanya Mone : त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच कला आणि नाट्यविश्वातून हळहळ व्यक्त होत असून अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Sukanya Mone : मराठी रंगभूमीला नवे आयाम देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचे मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विजया मेहता यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार नाट्यकृती रंगभूमीवर साकारल्या. केवळ उत्कृष्ट नाटकेच नव्हे, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक घडले. मराठी रंगभूमीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अतुलनीय मानले जाते.
त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी वाळकेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच कला आणि नाट्यविश्वातून हळहळ व्यक्त होत असून अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही सोशल मीडियावर अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. “बाई गेल्याचं कळताच छातीत धस्स झालं… आणि त्यांच्यासोबत घालवलेले सगळे दिवस डोळ्यांसमोरून सरकले,” अशा शब्दांत त्यांनी विजया मेहता यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा : RAJASTHAN ROAD ACCIDENT: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; बस-ट्रेलरच्या धडकेत ८ जणांचा मृत्यू
नागमंडल चे सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी विजया मेहता यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत पोस्ट लिहिली आहे. बाई गेल्या…. असा विजय केंकरेचा फोन आला आणि छातीत धस्स झालं…त्याची तब्बेत वयोमानाप्रमाणे बरी नव्हती हे कळलं होत… पण भेटायला जायची हिंमत होत नव्हती… बातमी आली life line… नागमंडल चे सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले… आणि बाईंचा आवाज कानात घुमायला लागला. ते त्याचं डोळे मिचकावून हसण … गोड स्वरात अगदी एखाद्या लहानग्या बाळाला समजावावं असे बोलणं… सगळ सगळ आठवायला लागलं… नागमंडळच्यावेळी माझे केलेले लाड…
ती आठवण सांगितली
Life line मध्ये खरेतर एकाच भागात माझे काम होते परंतु माझे काम आणि माझी त्याला योग्य असलेली प्रकृती बघून माझी भूमिका शेवटपर्यंत त्यांनी ठेवली. नुसती ठेवली नाही तर प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी भूमिका मला दिली. माझं महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष होते म्हणून मला आणि रेणुका ला ( ती M.A. करत होती ) नानावटी हॉस्पिटल मध्ये जिथे आमचे शूटिंग चालू होते तिथे अभ्यासकरता एक वेगळी room दिली होती. नागमंडल च्या वेळी माझे दुसरे नाटक चालू होते परंतु त्या भूमिकेसाठी त्यां.. इथून पुढे त्यांची पोस्ट नाही. म्हणजेच अर्धवट दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हळहळ व्यक्त करत कमेंट केल्या आहेत.
विजया मेहता यांच्याविषयी…
‘बाई’ म्हणून मिळाली उपाधी
मराठी रंगभूमी आणि समांतर सिनेसृष्टीवर आपल्या अफाट प्रतिभेचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि रंगकर्मी विजया मेहता यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आधुनिक मराठी रंगभूमीच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या विजया मेहता यांना नाट्यविश्वात प्रेमाने आणि आदराने ‘बाई’ म्हणून संबोधले जात असे.
ही आहे दिग्दर्शनाची खास ओळख
१९६० च्या दशकात त्यांनी विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासह ‘रंगायन’ या प्रायोगिक नाट्यचळवळीची स्थापना केली. या चळवळीने मराठी रंगभूमीला नवे विचार, वेगळी अभिव्यक्ती, प्रयोगशील दिग्दर्शन आणि जागतिक दर्जाची ओळख मिळवून दिली. आशयप्रधान आणि अर्थगर्भ नाट्यप्रयोग ही विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाची खास ओळख ठरली.
‘पार्टी’ चित्रपटातील अभिनयासाठी विशेष दाद
अभिनेत्री म्हणूनही त्यांनी ‘संशयकल्लोळ’, ‘तुझे आहे तुजपाशी’ आणि ‘सुंदर मी होणार’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांत प्रभावी भूमिका साकारल्या. तर समांतर सिनेसृष्टीत ‘पार्टी’ चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला विशेष दाद मिळाली. दिग्दर्शिका म्हणून ‘पेस्तनजी’ आणि ‘रावसाहेब’ हे त्यांचे चित्रपट आजही दर्जेदार सिनेमांच्या यादीत आवर्जून घेतले जातात.
‘झिम्मा’ आत्मचरित्र
‘नाटकाचं चालतं-बोलतं विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या विजया मेहता यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक पिढ्यांतील कलाकार, दिग्दर्शक आणि रंगकर्मी घडवले. त्यांचे ‘झिम्मा’ हे आत्मचरित्र केवळ त्यांच्या आयुष्याचा प्रवास मांडत नाही, तर मराठी रंगभूमीच्या इतिहासाचाही महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानले जाते.
विविध पुरस्कारांनी गौरव
आपल्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत विजया मेहता यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. त्यामध्ये पद्मश्री, नाट्यदर्पण पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णूदास भावे सुवर्णपदक, रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान यांचा समावेश आहे. त्यांच्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्रालाही भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार अशा अनेक मानाच्या सन्मानांनी गौरविण्यात आले.





