“इतिहास माझ्या कार्यकाळाचे मूल्यमापन कसे करेल याची मला चिंता वाटते” – सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड

नवी दिल्ली/थिंफू – मी पूर्ण निष्ठेने देशाची सेवा केली आहे. इतिहास माझ्या कार्यकाळाचे मूल्यमापन कसे करेल याची मला चिंता आणि काळजी वाटते, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश (सीजीआय) डी.वाय. चंद्रचूड यांनी केले. भूतानमधील जिग्मे सिंगे वांगचुक स्कूल ऑफ लॉच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात आपल्या भाषणात सरन्यायाधिश बोलत होते.
चंद्रचूड यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात 10 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना 9 नोव्हेंबर 2022 रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. त्यांनी 13 मे 2016 रोजी न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
मी जे काही करायचे ते मी साध्य केले का? इतिहास माझ्या कार्यकाळाला कसा न्याय देईल? मी गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो का? न्यायाधीश आणि कायदेशीर व्यावसायिकांच्या भावी पिढ्यांसाठी मी कोणता वारसा सोडणार आहे?, असे अनेक प्रश्न मनात असल्याचेही चंद्रचूड यांनी यावेळी सांगितले.
चंद्रचूड पुढे म्हणातात, यापैकी बहुतेक प्रश्नांची उत्तरे माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत. आणि यापैकी काही प्रश्नांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मात्र, मला माहीत आहे की, गेल्या दोन वर्षांत मी माझे काम चोखपणे करीन या वचनाने रोज सकाळी उठतो आणि मी माझ्या देशाची सेवा तत्परतेने केल्याचे समाधान घेऊन झोपतो.
जगाला प्रेरणा देणारे नेते हवे –
तुम्ही तुमच्या प्रवासातील अडचण नेव्हिगेट करत असताना, एक पाऊल मागे घेण्यास घाबरू नका, पुनर्मूल्यांकन करा आणि स्वतःला विचारा, मी गंतव्यस्थानाकडे धावत आहे की मी माझ्या दिशेने धावत आहे? फरक लहान पण गहन आहे. शेवटी जगाला अशा नेत्यांची गरज आहे जे केवळ महत्त्वाकांक्षेने नव्हे तर हेतूने चालतात, असेही ते पुढे म्हणाले.





