Weather update – समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे निर्माण होणाऱ्या मरिन हीटवेव्हज (समुद्री उष्णतेच्या लाटा) आता मानवी वस्ती आणि अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. एका ताज्या संशोधनानुसार, या उष्णतेच्या लाटांमुळे चक्रीवादळांना अतिरिक्त ऊर्जा मिळून ती ‘सुपरचार्ज’ होत आहेत. यामुळे जमिनीवर धडकण्यापूर्वी चक्रीवादळांची तीव्रता प्रचंड वेगाने वाढत असून, परिणामी अब्जावधी डॉलर्सचे नुकसान करणाऱ्या मोठ्या आपत्तींमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायन्स ॲडव्हान्सेस या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनासाठी १९८१ ते २०२३ या चार दशकांतील जागतिक डेटाचा अभ्यास करण्यात आला. Weather update संशोधकांना असे आढळले की, जेव्हा एखादे चक्रीवादळ समुद्री उष्णतेच्या लाटेच्या संपर्कात येते, तेव्हा त्याच्या वाऱ्याचा वेग अवघ्या २४ तासांत ३० नॉट्स (सुमारे ५५ किमी प्रति तास) किंवा त्यापेक्षा जास्त वाढतो. या प्रक्रियेला रॅपिड इन्टेन्सिफिकेशन असे म्हटले जाते. यामुळे किनारपट्टीवर धडकताना ही चक्रीवादळे अधिक विध्वंसक रूप धारण करतात, ज्यामुळे जीवित आणि वित्तहानीचा धोका अनेक पटींनी वाढतो. केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणूनच नव्हे, तर आर्थिक दृष्टिकोनातूनही ही स्थिती चिंताजनक आहे. संशोधकांनी स्पष्ट केले की, किनारपट्टीवरील विकास आणि लोकसंख्या सारखीच असली तरी, समुद्री उष्णतेच्या लाटेमुळे तीव्र झालेली चक्रीवादळे इतर वादळांच्या तुलनेत जास्त आर्थिक नुकसान करतात. अधिक वेगवान वारे, अतिवृष्टी आणि समुद्राच्या लाटांचे वाढलेले प्रमाण यामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होत असून अब्जावधी डॉलर्सची हानी करणाऱ्या आपत्तींची वारंवारता वाढली आहे. भारतापुढील वाढते संकट (Weather update) या अभ्यासात प्रामुख्याने उत्तर हिंदी महासागर क्षेत्रातील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा उल्लेख करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, या भागात दरवर्षी सरासरी दोनपेक्षा जास्त समुद्री उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत. २००५ सालापासून या दोन्ही समुद्रांच्या पृष्ठभागाचे तापमान सातत्याने वाढत असून, हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. हे जागतिक तापमानवाढीचे थेट परिणाम असून, यामुळे या प्रदेशात चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. आपत्ती निवारण यंत्रणेसमोर मोठे आव्हान अलाबामा विद्यापीठासह विविध जागतिक संस्थांच्या संशोधकांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात समुद्री उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. Weather update वाढत्या तीव्रतेच्या या वादळांचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच सज्ज राहणे, हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठीही अनिवार्य झाले आहे.