25 Years of Gadar : ‘गदर’चा जन्म कसा झाला? अनिल शर्मा यांनी उलगडले २५ वर्षांपूर्वीचे रहस्य
25 Years of Gadar सुरुवातीला अनेकांनी ‘गदर’ चालणार नाही, असे सांगितले होते. काहींनी तर हा चित्रपट पंजाबी वाटत असल्याने हिंदीत डब करण्याचाही सल्ला दिला होता. त्याचवेळी लगान या चित्रपटासोबत त्याचा सामना होता. मात्र, दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

25 Years of Gadar : सनी देओल आणि अमीषा पटेल यांची 2001 मध्ये प्रदर्शित झालेली ‘गदर : एक प्रेम कथा’ ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानली जाते. या चित्रपटाला आता तब्बल 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला आणि चित्रपटाशी संबंधित काही भावनिक व रंजक किस्से सांगितले.
अनिल शर्मा यांनी सांगितले की, ‘गदर’ ही केवळ एक चित्रपटकथा नव्हती, तर भारताच्या फाळणीच्या वेदनेतून जन्माला आलेली एक प्रेमकथा होती. फाळणीमुळे लाखो लोक उद्ध्वस्त झाले, अनेकांनी आपली माणसं गमावली. हा इतिहास लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यातूनच द्वेषाच्या वातावरणात फुलणाऱ्या प्रेमाची कथा साकारण्याचा विचार जन्माला आला.
चित्रपटातील सर्वात धोकादायक दृश्यांपैकी एक म्हणजे ट्रेनवरील क्लायमॅक्स सीन. त्या काळात आजच्यासारखे अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स नव्हते. त्यामुळे अनेक दृश्ये प्रत्यक्ष परिस्थितीतच चित्रित करण्यात आली. चालत्या ट्रेनवर सनी देओल यांनी एका डब्यातून दुसऱ्या डब्यावर उडी मारायची होती. त्यांच्या खांद्यावर अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष होता, ज्याने चित्रपटात जीतेची भूमिका साकारली होती. दिग्दर्शक म्हणून त्यांनी या दृश्याला परवानगी दिली होती, पण वडील म्हणून त्यांना प्रचंड भीती वाटत होती. त्यांनी काही क्षण डोळेच बंद करून घेतले होते.
आणखी एक प्रसंग त्यांना आजही विसरता येत नाही. अमृतसर रेल्वे स्टेशनवरील फाळणीचा सीन चित्रित करताना एका वृद्ध शीख व्यक्तीला रडताना त्यांनी पाहिले. शॉट संपल्यानंतरही ते शांत होत नव्हते. विचारल्यावर त्यांनी सांगितले की, ते स्वतः दहा वर्षांचे असताना अशाच एका ट्रेनमधून भारतात आले होते. हे ऐकून संपूर्ण टीम भावूक झाली. त्या दिवशी अनिल शर्मा यांना जाणवले की, ते फक्त चित्रपट बनवत नाहीत, तर लोकांच्या जिवंत आठवणी पडद्यावर आणत आहेत.

Gadar Ek Prem Katha
विशेष म्हणजे, सुरुवातीला अनेकांनी ‘गदर’ चालणार नाही, असे सांगितले होते. काहींनी तर हा चित्रपट पंजाबी वाटत असल्याने हिंदीत डब करण्याचाही सल्ला दिला होता. त्याचवेळी लगान या चित्रपटासोबत त्याचा सामना होता. मात्र, दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
तारा सिंहच्या भूमिकेसाठी अनिल शर्मा यांच्या मनात सुरुवातीपासून फक्त सनी देओल यांचेच नाव होते. त्यांच्या मते, या भूमिकेसाठी आवश्यक असलेली ताकद, राग, निरागसपणा आणि धाडस सनी देओल यांच्यातच होती.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक मजेशीर प्रसंगही घडला. एका दंगलीच्या दृश्यासाठी हजारो बनावट दगड तयार करण्यात आले होते. मात्र, शूटिंग लांबल्यामुळे ते संपले आणि काही लोकांनी खरे दगड फेकायला सुरुवात केली. त्यामुळे सेटवर गोंधळ उडाला होता.
सकीनाच्या भूमिकेसाठी तब्बल 400 हून अधिक मुलींची ऑडिशन घेण्यात आली होती. पाकिस्तानमधील पात्रांसाठी मोठे कलाकार घेतल्यामुळे बजेट मर्यादित होते. त्यामुळे नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. त्यावेळी अमीषा पटेल यांची निवड झाली. त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून अनिल शर्मा यांनी त्यांनाच सकीना म्हणून निश्चित केले.
अनिल शर्मा यांनी शेवटी सांगितले की, चित्रपटातील प्रत्येक मोठा सीन लिहितानाच त्यांना प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकू येत होत्या. ‘हिंदुस्तान जिंदाबाद होता, आहे आणि राहील’ यासारखे संवाद लोकांच्या मनात कायमचे घर करून गेले. आज 25 वर्षांनंतरही ‘गदर’ला मिळणारे प्रेम हेच त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे यश आहे.



