Sanjay Raut : “राज्य सरकार आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे?” ; मराठा आरक्षणावरून संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मागणीने राज्यात जोर धरला आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देऊन आपलं उपोषण मागे घेतलं होतं. परंतु, ही मुदत संपत आली तरीही या प्रकरणात तोडगा निघाला नाही त्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी,”राज्य सरकारमधील काही लोक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करत असल्याचा आरोप केला आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर ते महाराष्ट्रभर जनजागृतीसाठी फिरत आहेत. दुसऱ्या बाजूला या एका महिन्यात तीन मराठा तरूणांनी आत्महत्या केली आहे. पण सरकार काय करतंय? सरकारने एक महिन्यात काय केलं? एक महिन्याचा वेळ घेतला होता आता ती मुदत संपली आहे. आज तुम्ही महाराष्ट्रातील कुठलंही वर्तमानपत्र घ्या. प्रत्येक वर्तमानपत्रात शिंदे सरकारची जाहिरात आहे. या पानभर जाहिरातीत त्यांनी म्हटलं आहे की आम्ही आरक्षण देतोय. आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देतोय. परंतु, त्यासाठी तुम्हाला आणखी किती वेळ पाहिजे?” असा सवाल त्यांनी (Sanjay Raut) उपस्थित केला.
पुढे बोलताना संजय राऊत(Sanjay Raut) राज्य सरकारला उद्देशून म्हणाले, तुमच्या मंत्रिमंडळात आणि पक्षांमध्ये काही नेते आहेत जे राज्यातलं वातावरण बिघडवत आहेत. हे लोक दिवाळीआधी राज्यात दंगली घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ काहीतरी बोलतात, तर शिंदे गटातील नेत्यांची वेगळी मतं आहेत. शिंदे गटात काही नेते आहेत, जे स्वतःला मराठा समजतात, ही मंडळी मनोज जरांगे पाटलांविरोधात लोकांना भडकवणारी भाषणं देत आहेत. आम्ही मराठे आहोत, आम्ही कुणबी जातप्रमाणपत्र घेणार नाही. अशी वक्तव्ये करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
“ज्यांना गरज आहे, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी देखील यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. परंतु, जे स्वतःला मोठे मराठा मानतात, ज्यांच्याकडे सर्वकाही आहे, आलिशान गाड्या बंगले आहेत त्या मराठ्यांनी कुणबी जातप्रमाणपत्रास विरोध केला आहे. दुसरीकडे, छगन भुजबळ वेगळंच काहीतरी बोलत आहेत. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. अजित पवार तर लोकांना, पत्रकारांना घाबरत आहेत. प्रश्न विचारल्यावर ते पळून जातात. राज्यात लोक आत्महत्या करू लागले आहेत, हे सगळं कधीपर्यंत चालणार? हे राज्य सरकार आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे?”





