पुणे – भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या करामतींबद्दल आपण अनेकदा मोठ्यांकडून ऐकले आहे, पण भगवान कृष्णाचा मृत्यू नेमका कसा झाला? मृत्यूचे कारण काय होते? मृत्यूनंतर श्रीकृष्णाने आपला देह सोडला का आणि त्यांच्या मृत्यूनंतर काय झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात नक्कीच आहे. आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला ते सांगू. चला तर, जाणून घेऊया.
भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत ई.स.पूर्व 3112 दरम्यान झाला. त्यांचे बालपण वृंदावन, बरसाना, नांदगाव, गोकुळ, द्वारका अशा ठिकाणी गेले. असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाने द्वारकेवर 36 वर्षे राज्य केले, त्यानंतर त्यांनी देह सोडला. त्यावेळी त्यांचे वय 125 वर्षे होते. खरंतर त्यांच्या मृत्यूमागे दोन शाप आहेत, त्यांच्याबद्दल आज जाणून घेऊया.
असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर दुर्योधन आणि त्याच्या सर्व भावांचा अंत झाला तेव्हा त्यांची आई गांधारी खूप संतापली. आपल्या मुलांच्या मृतदेहांजवळ शोक करत असताना गांधारीने कृष्णाला 36 वर्षांनी युद्धभूमीवर मरण्याचा शाप दिला. हे ऐकून पांडव चकित झाले, पण कृष्णाने हसतमुखाने शाप स्वीकारला. यानंतर बरोबर 36 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा एका शिकाऱ्याच्या हातून मृत्यू झाला.
भागवत पुराणात असे सांगितले आहे की, एकदा कृष्णाचा पुत्र सांब याने एक खोडी करण्याचा विचार केला. त्यानुसार सांब हा एका स्त्रीच्या वेशात आपल्या मित्रांसह ऋषींना भेटायला गेलास. स्त्रीच्या वेशात आलेल्या सांबने ती गर्भवती असल्याचे ऋषींना सांगितले. यदुवंशकुमाराच्या या चेष्टेने संतप्त होऊन ऋषींनी त्याला शाप दिला की, तू अशा लोखंडी बाणाला जन्म देशील, जो तुझ्या संपूर्ण वंशाचा नाश करेल.
हा शाप ऐकून सांब घाबरला आणि त्याने उग्रसेनला सर्व प्रकार सांगितला. शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी उग्रसेनने सांबला बाणांचे चूर्ण बनवून प्रभास नदीत वाहून देण्यास सांगितले. त्यानंतर सांबने तसेच केले. यानंतर, उग्रसेनने राज्यात एक आदेश काढला की यादव राज्यात कोणीही कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ अजिबात वापरणार नाही, त्याचे उत्पादन तसेच वितरण करणार नाही.
या घटनेनंतर द्वारकेत अनेक अशुभ चिन्हे दिसू लागली. ज्यामध्ये सुदर्शन चक्र, बलरामाचा नांगर आणि श्रीकृष्णाचा शंख, रथ नाहीसा झाला. हळुहळु येथे गुन्हे आणि पापंही वाढू लागली आणि एक काळ असा आला की सर्व नगरवासी दारूच्या नशेत गुरफटले गेले. ते आपापसात भांडू लागले आणि मरू लागले. अशा रीतीने सर्वजण एकमेकांशी लढत मारले गेले.
भागवत पुराणात असे सांगितले आहे की एके दिवशी श्री कृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना जरा नावाच्या एका शिकाऱ्याने भगवान श्रीकृष्णाला हरीण समजले आणि बाण मारला, त्यानंतर श्रीकृष्णाने आपला देह सोडला आणि ते मरण पावले.
खरे तर या बाणामध्ये त्याच लोखंडी बाणाचा एक भाग होता, जो उग्रसेनच्या सांगण्यावरून सांबने चूर्ण करून नदीत वाहून दिला होता. अशा प्रकारे ऋषींच्या शापानुसार सर्व यदुवंशीयांचा नाश झाला. गांधारीच्या शापानुसार श्रीकृष्णाचा मृत्यू झाला, असे मानले जाते.