रुग्णालयाचा निष्काळजीपणा; चुकीच्या इंजेक्शनमुळे पाच रुग्णांचा मृत्यू

भुवनेश्वर – ओडिशाच्या कोरापुट येथील शहीद लक्ष्मण नायक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये काही तासांत पाच गंभीर आजारी रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूचे कारण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेले चुकीचे इंजेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. मृत रुग्ण हे दक्षिण ओडिशाच्या कोरापूट, बोरिगुम्मा, सेमिलीगुडा, मलकानगिरी आणि कालाहांडीसह विविध भागातील होते.
या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतरच्या काळजी आणि गंभीर देखरेखीसाठी आयसीयू आणि सर्जिकल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, आयसीयूमध्ये दाखल असलेले तीन रुग्ण आणि जनरल सर्जरी बेडवर असलेले दोघे जण अल्पावधीत मरण पावले. त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी रुग्णांना दुसऱ्यांदा इंजेक्शन दिले होते.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले की, जेव्हा रुग्ण गंभीर स्थितीत असतो तेव्हा आपल्याला काही इंजेक्शन द्यावे लागतात. प्रोटोकॉलनुसार, जेव्हा रुग्णाचा रक्तदाब कमी होतो तेव्हा आम्ही तो दाब सामान्य करण्यासाठी तेच इंजेक्शन देतो.
आम्ही संपूर्ण विभागाच्या मुख्याधिकारी यांचा समावेश असलेली एक प्राथमिक चौकशी समिती स्थापन केली आहे. जर कोणताही डॉक्टर औषध, इंजेक्शन आणि उपचारात निष्काळजीपणा दाखवत आढळला, तर आम्ही त्याच्यावर निश्चितच कारवाई करतो. या रुग्णांवर उपचार करत असलेल्या डाॅक्टरांनी सांगितले की, जर कोणतेही इंजेक्शन किंवा औषध कालबाह्य आढळले तर त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरवर कठोर कारवाई केली जाईल.





