Hingoli : हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन; जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर पैसे फेकून व्यक्त केला संताप
जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत असतानाही कृषी विभागाकडून प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

Hingoli : हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे तसेच बोगस जैविक कीटकनाशकांची विक्री होत असल्याचा आरोप करत (दि. 15) क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रतीकात्मक स्वरूपात पैसे फेकून कृषी विभागाच्या कथित निष्क्रियतेविरोधात निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला की, जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत असतानाही कृषी विभागाकडून प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला की, “जर कृषी विभागाला कारवाईसाठी पैसेच हवेत, तर आम्ही पैसे द्यायलाही तयार आहोत; मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे व जैविक कीटकनाशक विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी.” असे त्यांनी म्हटले.
संघटनेने प्रशासनाला इशारा देत सांगितले की, बोगस कृषी निविष्ठांविरोधात तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
त्यास सर्वस्वी सरकार व कृषी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे ,तालुका अध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, रमेश जाधव, प्रवीण घुमणार ,विशाल पोळ आदी उपस्थित होते





