पुसेगाव, (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, कान्होपात्रा, जनाई, मुक्ताई, सावित्रीबाई फुले आणि अगदी अलीकडच्या काळातील कै. इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाचा वारसा आपण जपला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह व संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार यांनी केले. पुसेगाव येथील श्री सेवागिरी व्याख्यानमालीचे चौथे पुष्प गुंफत असताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, देवस्थानचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव आणि नवोदित लेखक दिनेश फडतरे उपस्थित होते. सुनीताराजे पवार म्हणाल्या, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येणारा महिला संस्कृतीचा वारसा हाच आपल्या भारतीय लोकशाहीचा मुलाधार आहे. राष्ट्र निर्मितीचा मंत्र देणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करणाऱ्या सावित्रीबाई फुले, लढाऊ बाणा सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई तसेच पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी आपली बलस्थाने आहेत. प्राचीन काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत समाज परिवर्तनाच्या चळवळीत स्त्री अग्रस्थानी आहे. मात्र, प्रत्येक वेळी तिला कमी लेखण्याचा प्रयत्न झाल. म्हणून महिला असुरक्षितपणे जगतानाचे चित्र आपणाला दिसत आहे. समाज सजग असल्याची फक्त भावना ठेवून जमणार नाही तर प्रत्यक्षात आपण महिलांना त्यांच्या कर्तुत्वाला संधी देत स्वीकारले पाहिजे. कारण हा वारसा पुढे जपला तरच आपली लोकशाही तसेच संस्कृती समृद्ध होईल. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुनीताराजे पवार व लेखक दिनेश फडतरे यांचा मठाधिपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पुसेगाव ,बुध, खटाव, कटगुण, विसापूर, नेर, फडतरवाडी, अंगापूर आदी गावांसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. मोहन गुरव यांनी सूत्रसंचालन केले. संतोष वाघ यांनी आभार मानले.