Top 10 News : महाराष्ट्रात पावसाचा धडाका! ते जूनचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार? वाचा टॅाप 10 न्यूज
Top 10 News :

Top 10 News :
१ महाराष्ट्रात पावसाचा धडाका! अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून आज हवामान विभागाने दोन जिल्ह्यांना रेड, नऊ जिल्ह्यांना ऑरेंज आणि १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आला आहे.
पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
२ मॅनहोल दुर्घटनेसाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाच जबाबदार धरले जाणे कितपत योग्य आहे?
मिलिंद नार्वेकरांचा सवाल
मुंबईतील साकीनाका येथील खैरानी येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घेटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. विरोधकांकडून महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेयं.
यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी एक्सवरुन ट्वीट करत या दुर्घटनेसाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरलं जाण कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
या घटनेची महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेत ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित केलं आहे.
या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १० लाख रुपयांची आर्थिक मदत महापौर रितू तावडे यांनी जाहीर केलीये.
३ लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट!
जूनचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार? संभाव्य तारीख समोर
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’तील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असला तरी जून महिन्याचा १५,०० रुपयांचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा थकीत हप्ता येत्या १५ जुलैपर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी ही माहिती समोर आल्याने महिलांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आसपास लाभार्थींच्या खात्यात १,५०० रुपयांचा हप्ता जमा केला जातो.
४ आमिर खान पुन्हा अडकणार विवाहबंधनात?
५ जुलैला गौरी स्प्रॅटसोबत रजिस्टर लग्नाची चर्चा
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत.
आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ५ जुलै रोजी आमिर आणि गौरी रजिस्टर पद्धतीने लग्न करू शकतात. मात्र, या वृत्ताला अद्याप आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
रिपोर्ट्सनुसार, हे लग्न अत्यंत साधेपणाने आणि खासगी पद्धतीने पार पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील आमिर खानच्या घरीच रजिस्टर मॅरेज होऊ शकते, अशी चर्चा आहे. या सोहळ्यात केवळ दोन्ही कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक आणि काही निवडक मित्र उपस्थित राहतील, असेही सांगितले जात आहे.
५ अयोध्येतील कथित दानचोरी प्रकरणामुळे राजकारण तापलं!
अखिलेश यादव आक्रमक
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर येथील कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदारा टीका केलीये. तसेच भाजपला भविष्यात ना देणग्या मिळतील, ना मते असं म्हणतं हा मुद्दा दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.
“ते लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते खोट्या कहाण्या रचत आहेत आणि मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या वादात इतरांची नावे ओढत आहेत.” असं अखिलेश यादव यांनी म्हटलंय.
राम मंदिरातील दानचोरीच्या मुद्द्यावरून भाजपला देशातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. भाजपने धार्मिक मूल्ये आणि लोकशाही तत्त्वे या दोन्हींचा विश्वासघात केल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय.
६. अमोल कोल्हेंचं विधान
शरद पवारांचे खासदार फुटण्याची चर्चा
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात बोलताना, महायुतीकडून विकासकामांसाठी ऑफर आली तर त्यावर विचार करू, असे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या विधानानंतर शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांमध्येही फूट पडण्याची चर्चा रंगू लागलीये.
विरोधकांनी आधीच डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला असताना कोल्हेंच्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालयं. संजय राऊत यांनी हे विधान दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली, तर अमोल कोल्हे यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हणत आपण शरद पवारांसोबतच ठामपणे राहणार असल्याचे स्पष्ट केलयं.
दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी, ऑफर आल्यास विचार करण्याच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीतही बदलाचे वारे वाहत असल्याचा दावा केला. त्यामुळे भविष्यात शरद पवार गटातील खासदार पक्षाशी एकनिष्ठ राहणार की विकासकामांच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेणार, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
७ वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची तारीख ठरली!
भारतीय क्रिकेटचा ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाचा रस्ता अखेर मोकळा झालायं. बीसीसीआयच्या निवड समितीने त्याला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान दिले होते. मात्र, आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकले नव्हते. परंतु, आता वरिष्ठ सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनच्या सातत्यहीन कामगिरीमुळे शनिवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभवचे पदार्पण निश्चित मानलं जातंय.
भारतीय संघ जेव्हा शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला सलामीला पाठवले जाईल, असे संकेत मिळताहेत. क्रिकेट वर्तुळातील जाणकारांच्या मते, १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला केवळ एका सामन्यासाठी संघात घेतले जाणार नाही. जर तो सुरुवातीच्या काही सामन्यांत अपयशी ठरला, तरीही त्याच्यातील अफाट गुणवत्ता पाहता त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघ व्यवस्थापनाकडून पुरेशी संधी दिली जाईल.
८ चार महिन्यांनंतर होणार अली खामेनेई यांच्यावर अंत्यसंस्कार
इराणचे माजी सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या निधनानंतर तब्बल चार महिन्यांनी, म्हणजे ९ जुलै रोजी, इस्लामी परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मृतदेहाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर करण्यात आला नसल्याचा दावा करण्यात आलाय.
अली खामेनेई यांचे निधन २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात झाले होते. त्यानंतर इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तातडीने अंत्यसंस्कार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सरकारने त्यांचा मृतदेह सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवण्याचा निर्णय घेतला. आता परिस्थिती तुलनेने शांत झाल्यानंतर ४ जुलैपासून अंत्यसंस्काराचे धार्मिक विधी सुरू होणार असून ९ जुलै रोजी त्यांना दफन करण्यात येणार आहे.
९. शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत थकीत पीककर्जावर व्याज नाही
राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलीये. कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष कर्जखात्यात जमा होईपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीककर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिलेत.
३० जून २०२५ रोजी थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेली पात्र पीककर्जे या योजनेअंतर्गत ग्राह्य धरली जाणार असून, दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर एकवेळ समजोता योजनेचा लाभ मिळेल, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्याज आकारल्यास शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या थकबाकीत अनावश्यक वाढ होणार नाही आणि कर्जमुक्तीनंतर नव्याने पीककर्ज मिळण्याचा मार्गही अधिक सुलभ होणार आहे.
१०. उद्धव ठाकरे ‘ॲक्शन मोड’मध्ये!
राज्यभर ‘रामरक्षा महाआरती’ आंदोलनाची तयारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंड करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांत सभा घेऊन त्यांनी पक्षाची मोर्चेबांधणी सुरू केलीय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते मोठी घोषणा करण्याची शक्यता असून, अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान घोटाळ्याच्या मुद्द्यावरून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीये.
या आंदोलनाची सुरुवात दादर पश्चिम येथील हनुमान मंदिरात ‘रामरक्षा महाआरती’ने होणार असून, राज्यभरातील प्रमुख राम आणि हनुमान मंदिरांमध्येही महाआरतीचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान, पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून नेते सचिन अहिर यांनी वेगळी भूमिका घेतल्याने आदित्य ठाकरे यांच्यासमोरील राजकीय आव्हानेही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पक्षाची पुढील रणनीती काय मांडतात, याकडे राज्याचे लक्ष लागलंय.




