राजूर – भंडारदरा पाणलोटामध्ये परतीचा जोरदार पाऊस पडत असून, या पावसामुळे आदिवासी बांधवांच्या भात शेतीला फटका बसत आहे. दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये भात लागवडी आगाऊ झाल्या होत्या. त्यामुळे अनेक आदिवासी शेतकऱ्यांची भात पिके ही परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर भात पिके खराब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, तर काही भात पिके फुलोऱ्यावर असल्याने पडत असलेल्या पावसाने फुलोरा धुऊन जात असल्याने भातच तयार होणार नसल्याने आदिवासी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हा पाऊस नुकसानग्रस्त असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलावले जात आहे. परतीचा पाऊस जोरदार सुरू झाल्यामुळे भंडारदरा धरणाची खालावलेली पाण्याची परिस्थिती पुन्हा जोर धरू लागली आहे. धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांपेक्षा कमी झाला होता. आता पुन्हा एकदा भंडारदरा धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणीसाठा 99.88 टक्के झाला असून धरणामध्ये 11 हजार 026 दशलक्ष घनफुट पाणी जमा झाले आहे. भंडारदरा धरण तिसऱ्यांदा भरले आहे . निळवंडे 100% भरले आहे. गत २४ तासांमध्ये भंडारदरा येथे 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून घाटघर 77 मिमी, रतनवाडी 74 मिमी, पांजरे 44 मिमी तर वाकी येथे 62 मिमी पावसाची नोंद झाली आहे. निळवंडे धरणाच्या कॅनलमधून 180 क्यूसेस पाणी चालू आहे.