Sharad Pawar : बिहार राज्यात २४३ विधानसभेच्या जागांसाठीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाने पुन्हा एकदा बिहारच्या जनतेने एनडीएच्या हातात राज्याची सत्ता दिली आहे. या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले आहे. तर दुसरीकडे महागंठबंधनला जोरदार फटका बसला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहार राज्यात व्होट चोरी यात्रा काढली. मोठ्या संख्येने नागरिक या यात्रेत सहभाग झाले होते. पण निवडणुकीत मात्र याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे दिसत आहे. बिहार राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. ६० जागा लढविणाऱ्या काँग्रेसला केवळ ६ जागांवर विजय मिळवता आला आहे. ही काँग्रेससाठी मंथन करण्याची वेळ आहे. त्यामुळे आता काँग्रेला पक्षाला भविष्य आहे की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केले आहे. मला जी काँग्रेस समजते ती संपणारी नाही, असे विधान शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर आले असताना केले आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारी घेऊन आणि वेगळ्या स्थितीला पोहचले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याचे उदाहरण देण्यासाठी शरद पवारांनी १९५७ सालचा दाखल दिला. ते म्हणाले, यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला विचार केला तर, 1957 साली राज्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. लोकांनी महाराष्ट्र समितीला निवडणून दिलं होतं. त्याहीवेळी काँग्रेस संपली असं वाटलं, पण पक्ष अशा प्रकारे संपत नसतात. तो एक विचार असतो. मला जो काँग्रेस पक्ष समजतो तो संपणारा नाही, गांधी नेहरुंचा विचारसरणी स्वीकारणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. …तर आम्हालाही दुसरा विचार करावा लागेल : शरद पवार निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र व बिहारमध्ये सरकारने लाडकी बहीण नावाची योजना आणली. सरसकट दहा हजार रुपये देणारी अशी योजना कधी पाहिली नव्हती, त्या योजनेचा हा परिणाम आहे का? याचा विचार सामान्यांनी करावा. दहा हजार रुपये दिले हेच जर यशाचं कारण असेल तर आम्हालाही दुसरा विचार करावा लागेल. याला तोंड कसं द्यायचं याबाबत योजना तयार करावी लागेल, असे भाष्य शरद पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर केले आहे. संसदेचे अधिवेशन १ ते १९ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. देशातील प्रमुख विरोधकांना एकत्र घेऊन आम्ही या योजनांवर चर्चा करणार आहोत, असेही शरद पवार यावेळी बोलताना सांगितले. हेही वाचा : शेअर बाजाराची हिरव्या चिन्हावर ओपनिंग ! सेन्सेक्सची २२० अंकांची वाढ ; निफ्टीने २५,९७४ चा टप्पा ओलांडला