Heat wave in India : पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार; तापमान पोहोचणार ४५ अंश सेल्सिअसपर्यंत

नवी दिल्ली – भारतामध्ये सध्या सर्वत्र वाढत्या उन्हाचा दाह पाहायला मिळतोय. वाढत्या उष्णतेमुळे देशाच्या सर्वच भागातील नागरिक हैराण असून वायव्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. अशातच हवामान खात्याने किमान पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पारा झपाट्याने वाढत असून अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. बुधवारी देशाची राजधानी दिल्लीतील बहुतांश भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ दिसून आली. त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्येही तापमानात वाढ झाली आहे.
पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार
भारतीय हवामानशास्त्र विभाग नुसार, पुढील किमान पाच दिवस देशातील बहुतांश भागात लोकांना उष्णतेचा सामना करावा लागेल. त्याच वेळी, पुढील तीन दिवसांत, वायव्य भारतातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होईल. दिलासा देणारी बाब म्हणजे तापमानात वाढ झाल्यानंतर तापमानात 2 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यताही भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अशा प्रकारे, तुम्हाला उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार
राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये येत्या काळात उष्णतेत लक्षणीय वाढ होणार आहे. कारण या राज्यांच्या काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, त्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये तापमान 45अंश सेल्सिअसवर
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लोकही उष्णतेमुळे हैराण झाले आहेत आणि येथेही पारा वाढत आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
दिल्लीत दिवसभर उष्णतेची लाट
दिल्लीत दिवसभर उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत राष्ट्रीय राजधानीतील तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राजस्थानमधील कारखान्यांसाठी चार तासांची वीजकपात
राजस्थानमधील कारखान्यांसाठी चार तासांची वीजकपात निश्चित करण्यात आली आहे. असा निर्णय घेणारं राजस्थान गुजरात आणि आंध्र प्रदेशानंतर तिसरं राज्य बनले आहे. उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातही चार तास वीजपुरवठा खंडित
वाळवंटी प्रदेश असलेल्या राजस्थानातील ग्रामीण भागातही चार तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, त्यामुळे हजारो कुटुंबांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे आणि जूनमध्ये मान्सूनच्या अपेक्षित आगमनापूर्वी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जम्मू येथे ऋतूतील सर्वात उष्ण दिवस
केंद्रशासित प्रदेशात जम्मू आणि काश्मीरची हिवाळी राजधानी मानल्या जाणाऱ्या जम्मू येथे ऋतूतील सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला. येथे पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. वाढत्या तापमानामुळे जम्मू आणि काश्मीरातील विविध भागात वीज खंडित आणि जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ओडिशामध्ये 24 ठिकाणी तापमान 40 अंशांपेक्षा जास्त
ओडिशातही बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी लोकांना उष्णतेचा दाह सहन करावा लागला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 ठिकाणी तापमान 40 अंशांपेक्षा जास्त होते. कडक उन्हामुळे राज्यातील सर्व शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
वेळेपूर्वी उन्हाळी सुट्ट्या
पश्चिम बंगालमधील शैक्षणिक संस्थांमध्ये उन्हाळी सुट्ट्या वेळेपूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत. वृत्तानुसार, उन्हाळ्यामुळे राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 2 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
122 वर्षांनंतर मार्च हा सर्वात उष्ण महिना
या वर्षी, मार्च हा 122 वर्षांनंतर उत्तर-पश्चिम भारतातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. सरासरी 30.67 डिग्री सेल्सिअस तापमानाने 2004 सालचा पूर्वीचा विक्रम मोडला आहे.





