जामखेड तालुक्यातील ‘तो’ बिबट्या अद्यापही मोकाटच!

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण कायम
जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील नायगाव, बांधखडक शिवारात गेल्या 15 दिवसांपूर्वी आढळून आलेल्या बिबट्याला पडण्यास अजूनही वन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी कोणी बाहेर पडण्यास धजावत नाही. त्यामुळे या बिबट्याला पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे कायम आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यातील नायगाव परिसरात बिबट्याने तीन वासरे, तीन शेळ्या व दोन म्हशींच्या रेडकांवर हल्ला केला होता. यापैकी दोन शेळ्या व एक वासराचा मृत्यू झाला आहे. नायगाव जवळच्या परिसरात (बांधखडक) वावर वाढला असून, त्याने अनेक जनावरांवर हल्लाही केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याच्या पाऊलखुणांवरुन या भागात बिबट्याचा वावर आहे, हे सिद्घ झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पिंजरे लावूनही अद्यापपर्यंत बिबट्य जेरबंद झालेला नाही. मात्र 19 ऑगस्ट रोजी रात्री 9.45 च्या दरम्यान नायगावचे सरपंच शिवाजी ससाणे यांना गावाकडे येताना रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात बिबट्या दिसला. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना कल्पना दिली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी नायगाव येथे भेट देऊन या परिसरात पिंजरे वाढवण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र त्यांच्याकडून अद्याप कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या ज्वारी, गहू, मका, ऊस पिकांचे रानडुकरांनी नुकसान केले, तर त्यांचा अर्ज देण्यासाठी कर्जतला जावे लागते. त्यानंतर वन विभागाकडून पंचनामे केले जातात. ते ही त्यांच्या सवडीनुसार. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. त्यातच या डोंगरी भागात तरस, लांडगे, रानडुकरांचा वावर वाढला आहे. आता बिबट्या दिसल्याने नायगावसह नाहुली, तेलंगशी, धामणगाव, देवदैठण डोगरपठार भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत असून, दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन शेतात जात आहेत. पिंजरे लावून वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला असला, तरी जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना वस्तीवर राहावे लागत आहे.





