Suraj Chavan : ‘दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..’; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय
Suraj Chavan : लग्नानंतर त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे आता कुटुंबासाठी वेळ देणे आणि घरातील शांतता जपणे आवश्यक झाले आहे. आधी परिस्थिती वेगळी होती.

Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सुरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुरजची लोकप्रियता प्रचंड वाढली असून राज्यभरात याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.
त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते लग्न, नव्या घरापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. मात्र आता सुरजने चाहत्यांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे रात्रीच्या वेळी चाहत्यांना भेटणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
चाहत्यांमुळे घरात निर्माण झाला त्रास (Suraj Chavan)
एका कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत सुरज चव्हाणने चाहत्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले. तो म्हणाला की, आतापर्यंत त्याने प्रत्येक चाहत्याला सन्मान दिला, पण काही लोकांच्या वागण्यामुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागला.
सुरज म्हणाला, “मी माझ्या चाहत्यांचा खूप आदर करतो. त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे. पण काही जण रात्री उशिरा दारू पिऊन घरी येतात. एका व्यक्तीने विमल खाल्ल्यानंतर घरातील बाथरूममध्ये उलटी केली होती. हा प्रकार पाहून माझी पत्नी खूप नाराज झाली. त्यानंतर तिने चाहत्यांना घराबाहेरच भेटण्याचा सल्ला दिला.”
सुरजने पुढे सांगितले की, लग्नानंतर त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे आता कुटुंबासाठी वेळ देणे आणि घरातील शांतता जपणे आवश्यक झाले आहे. आधी परिस्थिती वेगळी होती. (Suraj Chavan)
आता माझं कुटुंब आहे. त्यामुळे यापुढे रात्री कोणालाही भेटता येणार नाही. चाहते माझ्या डोक्यावर नाही तर हृदयात असावेत. मी त्यांना कायम प्रेम आणि सन्मान देईन, पण त्यांनीही माझ्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करायला हवा,” असे तो म्हणाला.
सुरज चव्हाणचा प्रेरणादायी प्रवास… (Suraj Chavan)
सुरज चव्हाणचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या सुरजने सोशल मीडियावरील व्हिडिओंमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्याची ग्रामीण शैली, साधेपणा आणि विनोदी स्वभाव यामुळे तो अल्पावधीत लोकप्रिय झाला.
यानंतर त्याला ‘बिग बॉस मराठी 5’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. घरातील प्रामाणिक वागणूक, स्पष्टवक्तेपणा आणि सर्वांशी जुळवून घेण्याची वृत्ती यामुळे प्रेक्षकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केले. अखेर जनतेच्या मतांच्या जोरावर त्याने विजेतेपद पटकावत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.






