हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटील म्हणाले,’जे ठरलं होतं त्याचाच मी व्हाट्सअपला स्टेटस ठेवला..’

पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूर मतदारसंघातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच नुकतीच त्यांनी सिल्वर ओक या निवास्थानी शरद पवारांची भेट घेतली. जवळपास 1 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पक्ष प्रवेश निश्चित मानला जात असून आज (दि. 4) हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करणार असल्याची माहितीही समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करत असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या चर्चांवर हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले,’जे ठरलं होतं त्याचाच मी व्हाट्सअपला स्टेटस ठेवला होता. आता फक्त घोषणा बाकी आहे. अशी प्रतिक्रिया राजवर्धन पाटील यांनी दिली आहे.
याआधी समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर लोकसभेला सोलापूरमधून मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे धक्के बसत आहेत.
दरम्यान, महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील 5 वर्ष या मतदारसंघात तयारी करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी दुसरा पर्याय शोधला आहे. हर्षवर्धन पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरु होती. त्यात आज सिल्व्हर ओकवर झालेल्या भेटीनंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. पक्ष प्रवेशानंतर इंदापूरात हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या इंदापूर मतदारसंघात दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आहेत. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. महायुतीत ज्याचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज होते. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. लोकसभेवेळीच विधानसभेचा शब्द द्या अशी भूमिका तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून घेतली जात होती. स्वत: फडणवीस यांनी इंदापूरात जात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. मात्र विधानसभेला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारला.
कार्यकर्त्यांकडून तुतारी चिन्हावर लढण्याचा आग्रह
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे मतदारसंघात गाठीभेटी आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढायचीच असा चंग हर्षवर्धन पाटील यांनी बांधला आहे. त्यात कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घ्या असा आग्रह धरण्यात येत होता.





