कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांचबरोबर इंदापूर तालुक्यातील एकाही मोठ्या कार्यकर्त्याने भाजपमध्ये अद्याप प्रवेश केलेला नाही. तर कॉंग्रेस सोडत असताना राष्ट्रवादीवर टीका करून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे कॉंग्रेस सोडण्याचे कारण पाटलांना ठोस देता आले नाही. यामुळे पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कॉंग्रेसचे पहिल्या फळीतील नेते म्हणून पाटील यांच्याकडे राज्यात पाहिले जाते. त्यामुळेच इंदापूरची विधानसभा पाटील यांना सहजगत्या जिंकता आल्या. कॉंग्रेसच्या अडचणींच्या काळात पाटील हे कायम राहतील, असा विश्वास निष्ठावंत कार्यकर्त्यांना होता. मात्र, कॉंग्रेस सोडून हाती कमळ घेतले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरच्या विकासासाठी चौदाशे कोटींचा विकास निधी खेचून आणून कामे मार्गी लावली आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी कोट्यवधी रकमेचा निधी आणला आहे.
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केले आहे, गेली वीस ते पंचवीस वर्षे भाजप तसेच शिवसेनेवर हर्षवर्धन पाटील यांनी वेळोवेळी तोंडसुख घेतले आहे. परंतु काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेला याच पक्षाकडून विधानसभा पाटील लढवतील, असा लोकांचा अंदाज आहे. परंतु पाटील दोन्ही पक्षाच्या विरोधात सातत्याने बोलले. त्यांचा गौरव कोणत्या शब्दात करतील, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी काळात पाटील यांची राजकीय वहिवाट बिकट राहणार का, याबाबत उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.