खासदार फंड, लोकवर्गणीतून करंदीत हनुमान मंदिर साकारले

गावकऱ्यांकडून सढळ हाताने दातृत्वाची ओंजळ रिती
केंदूर – करंदी (ता. शिरूर) येथील 100 वर्षांपूर्वीचे ग्रामदैवत हनुमान मंदिर गावकऱ्यांनी तब्बल एक कोटी रुपये खर्च करून उभे केले आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या कार्यकाळात ग्रामस्थांच्या आग्रहाखातर आणि तत्कालीन खासदार आदर्श ग्राम योजनेत करंदी गाव समाविष्ट असल्याने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे विशेष लक्ष होते. त्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खासदार फंडातून आढळराव पाटील यांनी तब्बल पंचवीस लाखांची तरतूद करून दिली. उर्वरित रक्कम ही लोकसभागातून जमा करण्यात आली आहे.
करंदी गावचा संपूर्ण परिसर हा चासकमानच्या कालव्यामुळे बारमाही ओलिताखाली आले आहे. शेतकरी अर्थकारणामुळे सधन झाले आहेत. गावकऱ्यांनी लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. अनेक लोकांनी मंदिरासाठी हातभार लावला. या गावात बाहेरील पन्नासहून खातेदारांच्या शेतजमिनी आहेत. त्यांनी लाखो रुपयांची भरीव मदत केली आहे. दरम्यान, नव्याने उपसरपंच होणाऱ्या प्रत्येक उपसरपंच आणि गावच्या पुढाऱ्यांनीही मदत केली आहे. जुन्या मंदिराच्या जीर्ण झालेल्या वस्तूंची विक्री करून मिळालेले पैसे मंदिराच्या कमी आले.
सुरुवातील पन्नास लाखांचे नियोजित होते. मात्र मंदिरातील नक्षीकाम आणि इतर बदल झाल्यामुळे हे मंदिर एक कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. गावकऱ्यांनी प्रयत्न करून मंदिर पूर्ण केले आहे. मंदिरासाठी सर्वात जास्त रक्कम माजी उपसरपंच चेतन शिवाजी दरेकर यांची आहे. दरेकर यांनी 1 लाख 58 हजारांची देणगी दिली आहे.
ग्रामदैवत हनुमान देवाच्या संपूर्ण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी माजी चेअरमन रमेश नप्ते, संजय दरेकर, सूर्यकांत दरेकर, अनिल झेंडे, मुरलीधर नवगिरे यांचे सहकार्य लाभले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सोपान दरेकर यांनी सांगितले. मंदिराचा कलशारोहण पार पडला आहे.





