महागाईवरून लक्ष वळविण्यासाठी हनुमान चालिसाचा वाद ः थोरात

संगमनेर – केंद्रातील भाजपाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, जीवनावश्यक वस्तूंची जीवघेणी महागाई, बेरोजगारी यांसारख्या समस्यांनी जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष या ज्वलंत मुद्द्यांवरून दुसरीकडे वळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे काम काही लोक जाणीवपूर्वक करीत आहेत, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे नाव न घेता मंत्री थोरात म्हणाले की, देशातील जनता महागाईने होरपळत आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत. केंद्र सरकार या प्रश्नांवर अपयशी ठरलेले आहेत.
मुख्य मुद्यांवरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी काही लोकांना पुढे करून भाजप राज्यातील वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत. देशात सध्या धार्मिक राजकारण करून जातीय तेढ निर्माण केला जात आहेत. हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्था उत्तम असून प्रशासन त्यांचे काम करीत आहेत, पण वातावरण गढूळ करण्याचे काम करीत आहेत.
महाविकास आघाडी सरकार विरोधकांचे मनसुबे ओळखून आहेत, असेही थोरात म्हणाले. सरकार भक्कम आहे आणि आम्ही सर्व जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. तसेच राज्यातील जनता अशा प्रकारच्या षडयंत्राला बळी पडणार नाहीत.





