Pune News : हडपसर-सासवड रस्ता मृत्यूचा सापळा ! वड-पिंपळाच्या फांद्यांमुळे जीव टांगणीला; प्रशासनाला कधी येणार जाग?

हडपसर : पुण्यातील हडपसर-सासवड रस्त्यावरील सातववाडी परिसरात वड आणि पिंपळाच्या झाडांच्या अनियंत्रित वाढलेल्या फांद्या आणि पारंब्यांमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. या झाडांच्या लोंबकळणाऱ्या फांद्या रस्त्यावर आणि पादचारी मार्गावर येत असून, काही फांद्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शिरल्या आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे, तर वाहनचालकांना फांद्या तुटून पडण्याची भीती सतावत आहे.
स्थानिक प्रशासन आणि उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. “निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यावरच प्रशासन जागणार का?” असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे यांनी उपस्थित केला आहे.
धोक्याची टांगती तलवार
सातववाडी परिसरातील सासवड रस्त्यावरील वड आणि पिंपळाची जुनी झाडे आता नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यावर खाली लटकत असून, काही ठिकाणी त्या विजेच्या ट्रान्सफॉर्मर आणि तारांमध्ये अडकल्या आहेत. वडाच्या झाडांच्या पारंब्या पादचारी मार्गावर लोंबकळत असल्याने पायी चालणे धोक्याचे बनले आहे.
विशेषतः पावसाळ्यात फांद्या कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्या तुटून पडण्याची शक्यता वाढली आहे. अलीकडेच पहाटेच्या सुमारास एक फांदी पाऊस आणि वाऱ्यामुळे तुटून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या डीपी (वितरण पॉइंट)वर पडली. सुदैवाने, पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी टळली, पण फांदी फुटपाथवर पडल्याने मोठा अपघात टळला.
स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे यांनी सांगितले की, हडपसर क्षेत्रीय कार्यालय आणि उद्यान विभागाकडे याबाबत वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. “उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून विनंती केली, तरी त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही.
फांद्या तुटून डीपीवर पडतात, पादचारी मार्गावर धोका निर्माण होतो, तरीही क्षेत्रीय आणि उद्यान अधिकारी गांभीर्याने का घेत नाहीत?” असा सवाल सुरसे यांनी उपस्थित केला. रहिवाशांनी झाडांची नियमित छाटणी आणि धोकादायक फांद्या, पारंब्या काढण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला धोकादायक फांद्या आणि पारंब्या तातडीने काढून टाकण्याची मागणी केली आहे. याशिवाय, झाडांची नियमित छाटणी आणि देखभाल यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “आम्ही दरवर्षी तक्रारी करतो, पण प्रशासनाला जाग येत नाही. एखादा मोठा अपघात घडला तरच कारवाई होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी विचारला आहे.


