अजित पवारांची एन्ट्री झाली नसती, तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

नांदेड : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज नांदेड येथील कार्यक्रमात महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार आले नसते तर आमचेही 100 आमदार निवडून आले असते, अजित पवारांची एन्ट्री मागून झाली, कारण वरची अॅडस्टमेंट होती, असं खळबळजनक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांची सध्या आभार यात्रा सुरु आहे. ही आभार यात्रा आज नांदेडला पोहोचली. या आभार यात्रेच्या आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधी गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील म्हणाले, बालाजी कल्याणकर यांनी रडू रडू साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम केले. आपली मर्दाची शिवसेना आहे. या जिल्ह्यात तीन आमदार दिले आहेत. मी 25 वर्षांपासून आमदार आहे.
एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी काही सडलेले अंडे बोलतात. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केले आणि गुवाहाटीला गेलो. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यावर वर्चस्व केले. अनेक योजना या माणसाने आणल्या. त्यामुळे त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, एकनाथ शिंदे हा जादूगार माणूस आहे. बदनामी कितीही करा, या माणसाचे नाव काळजावर लिहितील. एकनाथ शिंदे माझ्या मतदारसंघात अडीच वर्षात २० वेळा आले. त्यांनी विविध योजना राबविल्या. आम्ही फक्त ८० जागा लढलो. उपमुख्यमंत्री अजित पवार नसते, तर आमचे १०० आमदार निवडून आले असते.
त्यांची मागून एन्ट्री झाली. ही शेवटी वरची तरतूद आहे. शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा निवडून येत नाही, असा इतिहास आहे. खरंतर आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही. संजय राऊत फुटले. त्यांनी शिवसेना फोडली. त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न भंग केले, असा टोलाही संजय राऊत याना लगावला.





