Gyanesh Kumar : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर आले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील निवडणूक प्रक्रिया मुक्त, न्याय्य आणि पूर्णपणे शांततेत पार पाडणे ही निवडणूक आयोगाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मतदार याद्यांच्या विशेष सुधारणा प्रक्रियेवर (SIR) भाष्य करताना ते म्हणाले की, एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. मतदार यादी पारदर्शक आणि शुद्ध ठेवण्यासाठी घटनात्मक निकषांनुसार ही प्रक्रिया देशभर राबवली जात आहे. तृणमूल काँग्रेसने ६४ लाख मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला होता, त्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही ग्वाही दिली आहे. आगामी निवडणूकीसंदर्भात माहिती देताना, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी सांगितले की, राज्यातील सर्व ८०,००० मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग केले जाईल, ज्यामुळे मतदानादरम्यान पारदर्शकता राहील. तसेच निवडणूक कार्यात गुंतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे निष्पक्ष राहणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा मतदारांना धमकावण्याचे प्रकार आयोग खपवून घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला. चुनाओ पोर्बो, पश्चिम बंगेर गोर्बो…Gyanesh Kumar यावेळी माहिती देताना ज्ञानेश कुमार म्हणाले की, ज्या नावांची अद्याप पडताळणी झालेली नाही किंवा जी नावे ‘न्यायाधीन’ श्रेणीत आहेत, त्यांची छाननी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू आहे. याबरोबरीने भाजपने ३ टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी केली होती. Gyanesh Kumar यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, निवडणूक किती टप्प्यांत घेतली जाईल, याचा निर्णय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन दिल्लीत जाहीर केला जाईल. आयोगाने या निवडणुकीसाठी “चुनाओ पोर्बो, पश्चिम बंगेर गोर्बो” (निवडणूक हा पश्चिम बंगालचा अभिमान) हे घोषवाक्य निश्चित केले आहे.