नवी दिल्ली :– गुजरातमध्ये कॉंग्रेस स्पर्धेतही नाही. त्या पक्षाला यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पाच ते सात जागांवरच समाधान मानावे लागेल, असा दावा आपने केला आहे.
आपचे गुजरात निवडणूक प्रभारी राघव चढ्ढा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
गुजरातमध्ये आपच बदलाचा समानार्थी शब्द बनला आहे. तेथील जनतेला भाजपच्या 27 वर्षांच्या भ्रष्ट आणि अहंकारी राजवटीपासून सुटका हवी आहे. त्यासाठी जनता पर्यायाच्या शोधात आहे. कॉंग्रेसला भाजपचा पराभव करणे शक्य झाले नाही. यावेळी तर कॉंग्रेस निवडणुकीतच सहभागी नसल्याचे जनतेला वाटत आहे. त्यातून आप हाच भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आला आहे.
गुजरातमधील भाजपच्या मतांचा वाटा वेगाने घटत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत (2017) त्या पक्षाला 48 टक्के मते मिळाली. यावेळी भाजपच्या मतांचा वाटा 36 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यापेक्षा अधिक मतं आपला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ इंदुर मध्ये दाखल
वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण हे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत मुद्दे आहेत. त्याविषयी आप सोडून कुठलाच पक्ष बोलत नाही. त्यामुळे गुजरातसाठी आपने तयार केलेली ब्लूप्रिंट तेथील जनतेला भावली आहे, असा दावाही चढ्ढा यांनी केला.