इंदूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज रविवारी मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात पोहोचली आहे. यावेळी समाजातल्या विविध घटकातील लोकांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी एका अपंग इसमाची व्हीलचेअर काही काळ स्वत: ढकलली. या इसमाने देशात आता बदलाची गरज असल्याचे मत राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेल्या महू येथे ही यात्रा काल रात्री मुक्कमासाठी थांबली होती. तेथून आज सकाळी यात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा उपनगरीय भाग पार करून इंदूरला पोहोचली. तेथे यात्रेच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरण्यात आला. यात्रेला सुरक्षा देण्यासाठी शहरात 1,400 कर्मचारी तैनात करण्यात आले असून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
एका पत्राद्वारे कमलनाथ आणि राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र एका मिठाई दुकानदाराकडे पाठवण्यात आले होते. त्यामुळे इंदुर मध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे. शहरातील चिमणबाग मैदानावर या यात्रेचा रात्रीचा मुक्काम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या सुरुवातीच्या योजनेनुसार गांधी आणि इतर यात्रेतील सहभागींना शहरातील खालसा स्टेडियममध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.परंतु सुरक्षेच्या कारणास्तव राहण्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.