Mahadevi Elephant : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीण परत आणण्याच्या प्रयत्नांना पहिले यश मिळाले आहे. नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार आणि वनतारा यांनी एकत्रितपणे दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून, यावर गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यामुळे कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महादेवी हत्तीण गेल्या ३५ वर्षांपासून नांदणी मठात राहत होती आणि जैन समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनली होती. १९९२ मध्ये ती वयाच्या तिसऱ्या वर्षी मठात आणली गेली होती. मात्र, तिच्या बिगडलेल्या शारीरिक व मानसिक आरोग्यामुळे (गंभीर संधिवात, पायाचे आजार आणि एकटेपणामुळे मानसिक तणाव) पेटा इंडियाने महाराष्ट्र वनविभाग आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीकडे (HPC) तक्रार केली होती. यानंतर, १६ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील वनतारा येथील राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टमध्ये पुनर्वसन करण्याचा आदेश दिला, जो सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै २०२५ रोजी कायम ठेवला. महादेवीला २९ जुलै २०२५ रोजी वनतारा येथे हलवण्यात आले, परंतु या निर्णयाविरोधात नांदणी गावकऱ्यांमध्ये आणि जैन समाजात तीव्र नाराजी पसरली. गावकऱ्यांनी महादेवीला आपल्या कुटुंबातील सदस्य मानले होते, आणि तिच्या मिरवणुकीत सहभागी होणे हा त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचा भाग होता. कोल्हापूरकरांचा आंदोलनाचा रेटा महादेवीला वनतारा येथे हलवल्यावर कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलने झाली. नांदणी ते कोल्हापूरपर्यंत ४५ किमीचा मोर्चा काढण्यात आला, आणि हजारो नागरिकांनी रिलायन्स इंडस्ट्रीजविरोधात निषेध नोंदवत जियो सिमकार्ड पोर्ट केले. स्थानिकांनी गावबंद आणि मूकमोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. यावेळी काही ठिकाणी वनतारा आणि वनविभागाच्या पथकावर दगडफेकही झाली, ज्याला पोलिसांनी हस्तक्षेप करून शांत केले. या आंदोलनांच्या रेट्यामुळे आणि स्थानिक आमदार राहुल आवडी यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी वनतारा प्रशासनाशी चर्चा करून एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. वनतारा यांनीही याचिकेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आणि महादेवीला परत आणण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.