Gramin News: हिंगोली जिल्ह्यात तलाठ्याचा भर दिवसा खून; तलाठी, मंडल आधिकारी आणि कोतवाल यांचे काम बंद आंदोलन

शिरुर : हिंगोली जिल्ह्यातील आडगाव गावातील तलाठी कार्यालयामध्ये संतोष देवराम पवार हे तलाठी म्हणून कामकाज पाहत होते. दि. २८ ऑगस्ट रोजी तलाठी कार्यालयात नियमित शासकीय कामकाज करत असताना चाकू भोकसून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे.
या भ्याड हल्ला करून ठार केलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी, कोतवाल यांनी एक दिवशीय कामकाज बंद आंदोलन करत सदर घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन शिरुर तालुका तलाठी संघातर्फे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र सारख्या राज्यात अश्या प्रकारे सरकारी कर्मचारी सोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदनीय व घृणास्पद असुन यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसुन येते. या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ निषेध करतो. या घटनेमुळे मयत तलाठी संतोष देवराव पवार यांचे संपुर्ण कुटुंब उध्वस्त झाले असुन केवळ संशयामुळे त्यांचे कोणताही दोष नसताना आरोपीच्या मानसिकतेमुळेच त्यांना जीव गमवावा लागला.
या घटनेमुळे राज्यातील तलाठीच नव्हे तर संपुर्ण सरकारी कर्मचारी यांचे खच्चीकरण झाले असुन कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा शिरुर चे माधव बिराजदार ,रमेश घोडे , गणेश बिघोत, दीपक गांगर्डे , पांडुरंग कोळगे , सतिश पलांडे ,आबासाहेब रुके, प्रशांत शेटे, जयमंगल धुरंधर, अंकुश सुपे आदी उपस्थित होते.





