Ration Card KYC : रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी…! 15 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी न केल्यास धान्य होणार बंद

Ration Card E Kyc Update : राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशनिंग लाभार्थ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. तसं जर केलं नाही तर धान्य बंद करण्यात येणार आहे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. शिवाय यासंदर्भात सर्व लाभार्थी व रास्त भाव धान्य दुकानदारांना 15 फेब्रुवारी पूर्वी 100 टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. आता रेशन धारक लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी पूर्वी आधार प्रमाणीकरण ई- केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा, ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना 15 फेब्रुवारी नंतर धान्य दिले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
असे करा ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण?
रेशनकार्डधारकांसाठी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सोपी करण्यात आली असून लाभार्थ्यांना जवळच्या रेशन दुकान किंवा सरकारद्वारे रबवल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये जाऊन आधार कार्ड व अंगठ्याचा ठसा देऊन प्रमाणीकरण करा.
१५ फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा
राज्य शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण न केल्यास लाभार्थ्यांना १५ फेब्रुवारी नंतर रेशन मिळणार नाही. त्यामुळे तातडीने जवळच्या रेशन दुकानात किंवा शिबिरामध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
ई-केवायसी का आवश्यक आहे?
शिधा केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ई-केवायसी प्रक्रियेचा उद्देश सरकारचा आहे. या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थ्यांना हटवून अधिक पारदर्शकता निर्माण होणार आहे. यामुळे मोफत शिधा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
अशी तपासा तुमची ई-केवायसी स्थिती?
- तुमच्या राज्याच्या अन्न सुरक्षा पोर्टलला भेट द्या.
- तुमचा शिधापत्रिकेचा क्रमांक टाका.
- शिधापत्रिका KYC स्थिती’ हा पर्याय निवडा.
- e-KYC पूर्ण असल्यास ‘होय’ असे दिसेल. अपूर्ण असल्यास ‘नाही’ असे दिसेल.
ई केवायसी करताना अडथळे?
काही ज्येष्ठ लाभार्थी यांचे मशीनवर हाताचे अंगठ्याच्या ठसे उमटत नाहीत. यासाठी पुरवठा विभागाने आय स्कॅनरची सुविधा गावोगावी पुरविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, खेडोपाड्यात हा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी रेशनिंग दुकानदारांनी आता कॅम्प घेणे सुरू केले आहे.





