Govind Pansare murder case: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पानसरेंच्या हत्येतील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा मोठा निर्णय दिला आहे. या हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच आहेत.
का जामीन मंजूर करण्यात आला ?
खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर केल्याचे हायकोर्टने म्हटले आहे. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टाकडून देण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए एस किलोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
कोल्हापूरच्या सम्राट नगर भागात मॉर्निंग वॉकवरून घरी परतत असताना दोन मोटारसायकलस्वारांनी गोविंद पानसरे यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या.यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. सुरुवातील, हे प्रकरण कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्याने हाताळले होते. नंतर हा तपास महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (सीआयडी) यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला होता.
तपास एटीएसकडे वर्ग
आरोपींचा शोध घेण्यात प्रगती नसल्याने असमाधानी असलेल्या पानसरे यांच्या कुटुंबाने हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात कोणतीही प्रगती दिसली नाही. तसेच प्रकरणातील दोन शूटर अजूनही फरार आहेत. यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी उच्च न्यायालयाने तपास एटीएसकडे हस्तांतरित केला.





