BJP : भाजपला रामराम? तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता; नेमक काय घडतंय?
BJP : दिल्लीला रवाना होताना त्यांच्या वाहनावर भाजपचा झेंडा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पक्षत्यागाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.

BJP : तामिळनाडूमधील भाजपचे आक्रमक आणि लोकप्रिय नेते अन्नामलाई लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपमध्ये आपले राजकीय भविष्य मर्यादित होत असल्याची भावना अन्नामलाई यांच्यात मनात निर्माण झाली असून ते स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोबत दिल्लीत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच या घडामोडी समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चेन्नई विमानतळावर पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता, “दोन दिवस थांबा, सविस्तर बोलतो,” असे सूचक उत्तर अन्नामलाई यांनी दिले होते. त्यानंतर अन्नामलाई आपली राजकीय भूमिका लवकरच जाहीर करतील अशा चर्चाना उधाण आले आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपला 234 पैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळाल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याचे मानले जाते. निवडणुकीनंतर अन्नामलाई यांना पक्षात दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये वाढली आहे.
दिल्लीला रवाना होताना त्यांच्या वाहनावर भाजपचा झेंडा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पक्षत्यागाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. पक्ष नेतृत्वाने त्यांना राज्यसभेची संधी देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अन्नामलाई यांनी तो प्रस्ताव नाकारल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, थेट राजकीय पक्ष स्थापन करण्याऐवजी अन्नामलाई प्रथम व्यापक जनआंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहेत. या माध्यमातून तरुण आणि समविचारी लोकांचे मजबूत नेटवर्क तयार करण्यावर त्यांचा भर असेल.
हेही वाचा : Weather update : राज्यावर अवकाळी संकट ! पुढील 24 तास महत्त्वाचे, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
अलीकडेच त्यांनी केंद्र सरकारच्या सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणावर उघडपणे टीका केली होती. 2029-30 पासून लागू होणाऱ्या धोरणाची अंमलबजावणी आत्ताच का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यामुळे त्यांच्या आणि पक्ष नेतृत्वातील मतभेद उघड झाल्याचे मानले जाते.
तामिळनाडूमध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यात अन्नामलाई यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली असताना, केंद्रीय नेतृत्वाने एआयएडीएमकेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. या युतीसाठी एआयएडीएमकेचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची अट घातल्याचे सांगितले जाते. भाजप नेतृत्वाने ती मान्य केल्यानंतर अन्नामलाई नाराज झाल्याची चर्चा आहे.
याच नाराजीमुळे त्यांनी 2026 ची विधानसभा निवडणूक लढवली नाही आणि प्रचारापासूनही अंतर राखले. आता ते नव्या राजकीय वाटचालीची तयारी करत असल्याच्या चर्चेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Dhairyashil Kadam : मंत्र्यांची फौज आणि जोरदार शक्तिप्रदर्शन; धैर्यशील कदमांचा उमेदवारी अर्ज दाखल






