मुंबई – मुंबईतल्या बेस्ट, उपनगरीय रेल्वे, मेट्रो इत्यादी सर्व प्रवासी सेवांचं एकाच माध्यमातून तिकिट देणारं मुंबई वन कार्ड लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत पत्रकार परिषदेत म्हणाले. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा समृद्ध इतिहास, तसंच राज्यातल्या इतर सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणारी भारत गौरव रेल्वेगाडी येत्या 16 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी केलेल्या भरीव तरतुदी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केल्या. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 4 हजार 819 रुपये खर्चून 240 किलोमीटर लांबीच्या गोंदिया-बल्लारशहा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. मुंबईसाठी लवकरच 238 नव्या वातानुकूलित उपनगरीय रेल्वेगाड्या आणण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच कवच 5.0 लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे रेल्वे यंत्रणेची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.