Maharashtra Politics : लवकरच गुडन्यूज! अखेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगून टाकलं; राज्याला मिळणार नवा अर्थमंत्री?
Maharashtra Politics : या पदासाठी राष्ट्रवादीच्या एका जेष्ठ नेत्याची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अर्थमंत्रीपदावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या पदासाठी राष्ट्रवादीच्या एका जेष्ठ नेत्याची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडे दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अधिवेशन संपूनही अर्थखाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने महायुतीतील राष्ट्रवादीकडून अर्थ खाते परत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची अर्थमंत्री म्हणून चर्चा रंगली आहे. या चर्चांवर स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “अर्थमंत्री होणार, ही चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी योग्य वेळी घेतील.” पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.
नेमकं काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
“अर्थमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठी काय चर्चा करत आहेत, याची आपल्याला माहिती नाही. निर्णय झाल्यानंतर तो सर्वांसमोर येईल. राजकारणात उद्या काय घडेल, हे आधी सांगता येत नाही. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा, चांगली बातमी ऐकायला मिळेल,” असे म्हणत त्यांनी सूचक संकेतही दिले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर मोठं वक्तव्य
तसेच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणावरही भाष्य केले. मतदारसंघ पुनर्रचना आणि मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याने अशा राजकीय घडामोडी एका रात्रीत घडत नाहीत. दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष घेतील. निर्णय झाल्यानंतर तो सर्वांना कळेल, असे सांगत त्यांनी पडद्यामागे नेमक्या काही हालचाली सुरू आहेत याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता अर्थमंत्री पद राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार की वेगळे काही घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






