आळंदीत उद्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभ; मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, पवार यांची उपस्थिती

आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त (750) श्री क्षेत्र आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरावर शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता सुवर्ण कलशारोहणाचा भव्य समारंभ संपन्न होणार आहे. या पावन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शुभहस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. सुवर्ण कलशारोहणाची प्रक्रिया ज्येष्ठ तपस्वी वारकऱ्यांच्या हस्ते पार पडेल.
या समारंभात सुवर्ण कलश पूजन, महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी (सार्थ) ऑडिओ बुक प्रकाशन असे प्रमुख कार्यक्रम होणार आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण संस्थानाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर उपलब्ध असेल, ज्यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या अनुभवता येईल. सुवर्णकलश पूजन मुख्यमंत्री फडणवीस, महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन उपमुख्यमंत्री शिंदे आणि श्री ज्ञानेश्वरी ऑडिओ बुक प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन योगी निरंजननाथ गुरू शांतिनाथ (प्रमुख विश्वस्त), चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा, विश्वस्त), डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे (विश्वस्त), अॅड. डॉ. रोहिणी पवार (विश्वस्त), अॅड. राजेंद्र बाबुराव उमाप (विश्वस्त) आणि पुरुषोत्तम मुरलीधर पाटील (विश्वस्त) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२४-२५ साजरे करताना हा समारंभ आळंदीच्या वारकरी परंपरेचे आणि माऊलींच्या विचारांचे वैभव अधोरेखित करणारा ठरणार आहे. भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थान कमिटीने केले आहे.
11 किलोचा सुवर्ण कलश –
माऊलींच्या मंदिरावर बसवण्यात येणारा सुवर्ण कळस हा 11 किलो वजनाचा असणार आहे. या सुवर्ण कळसासाठी भाविकांना देणगी देण्यासाठी संस्थान कमिटीकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या काही दिवसांत या कळसासाठी अनेकांनी दान दिले असून कोट्यवधी रुपयांची देणगी मिळालेली आहे. भाविकांकडून सोने, व रोख रक्कम रुपी दान माऊली चरणी अर्पण करण्यात आले आहे.





