Rohit Pawar : “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा…”; रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, अन्नत्याग आंदोलन करणार
Rohit Pawar : तसेच एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेतील अटी शिथिल करून दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Rohit Pawar : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते १२ जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आंदोलनाची माहिती देताना, २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली. तसेच एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेतील अटी शिथिल करून दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सुमारे ६.५६ लाख शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा, पीकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करून एक रुपयातील पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी आणि पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाला रोहित पवार यांनीही समर्थन दिले आहे.
गेल्या तीन-चार वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती, परंतू सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत.
सरकारने कर्जमाफी योजनेतील या जाचक अटीशर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा… pic.twitter.com/qDXwcWqD6s
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 6, 2026
गेल्या तीन-चार वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी अपेक्षा होती. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्तींमुळे बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नांवर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ट्वीटमध्ये काय म्हणालेत रोहित पवार?
सरकारने कर्जमाफी योजनेतील या जाचक अटीशर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्व महामानवांच्या प्रेरणेने विठुरायाच्या पंढरीत १२ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे, सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, ही विनंती!
आंदोलनासाठी आठवड्याचा वेळ आहे, तोपर्यंत सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, ही अपेक्षा!
हेही वाचा : Unseasonal Rain : इंदापूर तालुक्यात निसर्गाचे तांडव! वादळी पावसाने हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान






