Pune Gramin : घोड धरण ७८ टक्के भरले…! नदीपात्रात विसर्ग सुरु; शिरूर-श्रीगोंद्यासह 20,500 हेक्टर शेतीला वरदान

निमोणे : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये ७८ टक्के पाणीसाठा झाला असून धरणाच्या ३ दरवाज्यातुन घोडनदीपात्रात ५ हजार ५०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या धरणात ४ हजार ९७७ दशलक्ष घनफुट एवढा पाणीसाठा असुन त्यातील ३ हजार ८२१. ७९ दशलक्ष घनफुट इतका उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती उपविभागीय अभियंता महेश शिंदे यांनी दिली.
चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ७ हजार ६३८ दशलक्ष घनफुट असुन उपयुक्त पाणीसाठा ५ हजार ४६७ दशलक्ष घनफुट आणि मृत पाणीसाठा २ हजार १७२ दशलक्ष घनफुट आहे. धरणाला दोन कालवे असुन उजव्या कालव्याची लांबी ३० कि.मी आणि डाव्या कालव्याची लांबी ८४ कि.मी आहे. घोड धरणातून रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, तसेच शिरुर, काष्टी व श्रीगोंदा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी नेलेले आहे.
शिरुर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यातील मिळून सुमारे २० हजार ५०० हेक्टर क्षेत्र या धरणामुळे सिंचनाखाली आले आहे. धरणाच्या खालच्या बाजुस शिरसगांव काटा, धनगरवाडी, इनामगांव, नलगेमळा, गांधले मळा, तांदळी खोरे, तांदळी संगम येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असुन घोड धरणाच्या पाण्यामुळे या बंधाऱ्याना मोठया प्रमाणात फायदा होतो. सध्या घोड धरण ७८ टक्के भरल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.





