Gautam Gambhir Statement : “मला व्ह्यूज अन् लाईक्सशी काही देणेघेणे नाही, माझं काम फक्त…!”; कोलंबो कसोटीपूर्वी गंभीरची विरोधकांना चपराक
Gautam Gambhir Statement : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत आपल्या टीकाकारांना अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

Gautam Gambhir Press Conference ahead IND vs SL 2nd Test Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहे. गॉल कसोटीत १६५ धावांनी विजय मिळवत भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत भारताला परदेशात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर मालिकेवर कब्जा करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पत्रकार परिषदेत आपल्या टीकाकारांना अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.
‘रँकिंगने फरक पडत नाही, माझं लक्ष्य फक्त ट्रॉफी जिंकण्यावर!’; गंभीरचा रोखठोक बाणा
गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने घरच्या मैदानावर दोन मालिकांसह तीन मोठ्या कसोटी मालिका गमावल्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना गंभीर म्हणाला, “आयसीसी रँकिंगने मला काही फरक पडत नाही. आम्ही कोणताही संघर्ष करत नसून इंग्लंड दौऱ्यापासून सातत्याने चांगले क्रिकेट खेळत आहोत. माझं काम फक्त ट्रॉफी जिंकणे हेच आहे आणि मला केवळ त्याच गोष्टीची पर्वा आहे. इतर लोकांमध्ये आणि माझ्यात हाच मोठा फरक आहे. मला सोशल मीडियावरील व्ह्यूज किंवा लाईक्सची अजिबात पर्वा नाही.”
देवदत्त पडिक्कल आणि मानव सुथारच्या कामगिरीने समाधानी!
🔴MY JOB IS TO WIN TROPHIES, NOT VIEWS & LIKES – GAMBHIR 🤯
Gautam Gambhir 🎙️: “My job is to win trophies, not views and likes.”
On conversations with Ajit Agarkar: I wish I could. It’s only about how we want to move forward with Indian cricket.
On Test cricket: We are not… pic.twitter.com/Z99rBvzz1x
— Sam (@cricsam02) August 22, 2026
गॉल येथील पहिल्या कसोटीत देवदत्त पडिक्कलने झळकावलेली शतकी खेळी आणि पदार्पणवीर डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने घेतलेले १० विकेट्स यावर गंभीरने आनंद व्यक्त केला. “या दोघांची कामगिरी अत्यंत समाधानकारक आहे; मात्र अजून खूप सुधारणा करायची आहे. भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक बाब म्हणजे युवा खेळाडूंनी लगेच निकाल दिले आहेत. तरीही केवळ एका सामन्याच्या जोरावर खेळाडूंचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही,” असे मत गंभीरने मांडले.
कुलदीप यादवची पाठराखण; २० विकेट्स घेणारा संघ महत्त्वाचा!
पहिल्या कसोटीत सर्वात कमी षटके टाकणाऱ्या फिरकीपटू कुलदीप यादवचे समर्थन करताना गंभीर म्हणाला, “कुलदीपने केवळ विकेट्स मिळवण्यासाठी हताश न होता आपली सर्वोत्तम गोलंदाजी टाकण्यावर भर दिला पाहिजे. पहिल्या डावात त्याला कमी षटके मिळणे हा त्यावेळच्या परिस्थितीनुसार कर्णधाराचा निर्णय होता.” प्रतिस्पर्धी संघाचे २० विकेट्स मिळवून देऊ शकेल अशीच सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन निवडणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे गंभीरने स्पष्ट केले.





