गणेशोत्सवाचा सण संपूर्ण देशभरात तसेच परदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गणपती आणि गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी विसर्जन होणार आहे. या गौरी विसर्जनाच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. काही चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच गौरी विसर्जन चांगलं पार पडेल. तर या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊयात… गौरी विसर्जनाचा मुहूर्त गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन केलं जातं. त्यानुसार, यंदा 12 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी ते रात्री 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीत तुम्ही गौरी विसर्जन करु शकता. गौरी विसर्जन करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या 1) गौरी विसर्जना दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. लक्षात ठेवा गौरीची पूजा ही गौरीचे आभार मानण्यासाठी आणि गौरीला निरोप देण्यासाठी केली जाते. 2) गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ अर्पण करावेत. 3) गौरी विसर्जनाच्या वेळी 5 सौभाग्यवती महिलांना बोलावून थाळीचे वाण दिले जाते. आधी ताट देवीसमोर दाखवावे नंतर त्याची पूजा करावी. 4) गौरीची आरती झाल्यानंतर देवीवर अक्षता वाहून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. सोबतच विडा द्यावा. 5) गौरी मुखवट्याच्या म्हणजेच पंचधातूंच्या, सोन्या-चांदीच्या असतील तर दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन करावे. 6) देवीच्या विसर्जनानंतर त्यातली थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवावी.