Gas Cylinder Shortage – महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत यात्रा, जत्रा, लग्नसराई, शाळांना लागलेल्या सुट्ट्यामुळे भाविकांची संख्या वाढत आहे. मात्र, भाविकांवर अवलंबून असणारे हॉटेल व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत आले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास १३० हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जेजुरीत शासनाने गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत. यासाठी हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ अन्न, प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांना भेटणार असल्याचे विजय झगडे यांनी सांगितले. आखाती देशातील युद्धाचा भडका उडाला असून या युद्धामुळे हॉटेल्स व्यावसायिकांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने आणि पर्यायी साधने परवड नसल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर जेजुरी व पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेवून अडचणी मांडल्या आहेत. जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाची नगरी असून यात्रा जत्रा, लग्न सराई, शाळांना लागलेल्या सुट्ट्या आणि भाविकांचे कुलधर्म कुलाचारामुळे भाविकांची संख्या वाढली आहे. हॉटेल व्यावसायिकांना कोणतेही सिलिंडर मिळत नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. जेजुरी : जेजुरी व पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. जेजुरी येथील शहीद शंकर शिंदे गॅस एजन्सीचे संचालक सागर शिंदे म्हणाले, (दि.7) पासून व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध झाले नाहीत. शासनाच्या सूचनेनुसार घरगुती, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. पुरंदर तालुका पुरवठा अधिकारी गोपाळ ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आखाती युद्धामुळे गॅस सिलिंडरची टंचाई असून शासनाच्या आदेशानुसार व्यावसायिक गॅस सिलिंडर हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, अत्यावश्यक सेवांना प्रथम दिले जात असून असोसिएशनच्या समस्या वरिष्ठांपर्यंत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल्स असोसिएशनचे विजय झगडे, आप्पा बयास, पंकज राहटेकर, अक्षय दरेकर, गणेश गाढवे, ऋषिकेश दरेकर, अभिजित कुदळे, धनंजय गोडसे, मल्लू कोळी, योगेश भापकर, अविनाश हरपळे, शब्बीर तांबोळी आदी शंभराहून अधिक व्यावसायिक उपस्थित होते. २० टक्के पुरवठ्याची घोषणा हवेत विरली शासनाने २० टक्के व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करूनही अद्याप १५ दिवसांत एकही सिलिंडर उपलब्ध न झाल्याने जेजुरीत १३० हॉटेल, ढाबा, व खाद्यपदार्थांचे दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून हॉटेलमध्ये सरपण, कोळसा आणून चुलीवर पदार्थ तयार केले जात आहेत, सुमारे दीडशे पदार्थांपैकी केवळ दहा ते बारा भाज्या व पदार्थ तयार केले जात आहेत. हॉटेल बंद केले तर कामगार निघून जातील, पुन्हा मिळणार नाही या भीतीपोटी हॉटेल कसेबसे चालविले जात आहे. जेजुरीत भाविक व नागरिकांना हवे ते नाष्टा, जेवण उपलब्ध नसल्याने भाविकांची संख्या रोडवल्यास हॉटेल्स बंद पडणार आहे.