Garbage Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याचे ढीग का साचले? अखेर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मोठा खुलासा
Garbage Issue: प्रत्येक झोनमध्ये पर्यायी कचरा प्रक्रिया केंद्र आणि ट्रान्सफर स्टेशन उभारणार; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची सभागृहात माहिती.

Garbage Issue – मोशी येथील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण घडी विस्कटली असून, शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येबाबत प्रशासनही तितकेच संवेदनशील आहे, अशी भूमिका महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केली. गेल्या ५० दिवसांत प्रशासनाने कचरा प्रश्नावर एकही दिवस काम थांबविले नसल्याचा दावा करत,
कचरा प्रक्रिया व वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी आवश्यक जागांबाबत येत्या सात ते आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी बुधवारी (दि. २) सभागृहात दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनी शहरातील कचरा समस्या, मोशी येथील दुर्घटना, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, घंटागाड्यांची संख्या, कचरा प्रक्रिया केंद्रे तसेच इतर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले.
त्यावर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सविस्तर खुलासा केला. मोशी येथील दुर्घटना ८ जुलै रोजी घडली. त्यानंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अत्यंत बिकट झाला. शहरातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या परिस्थितीबाबत सभागृह जितके संवेदनशील आहे, तितकेच प्रशासनही गंभीर असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
१५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या ५० दिवसांत प्रशासनाने नेमके काय केले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असला तरी या कालावधीत एकही दिवस असा गेला नाही की प्रशासनाने कचरा प्रश्नावर काम केले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेकडे कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी आरक्षित जागा किती आहेत, याचीही सुरुवातीला स्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी जागांची पाहणी केली असता काही जागा केवळ सुका कचरा प्रक्रिया करण्याइतपत असल्याचे निदर्शनास आले.
चिमणी पडण्यापूर्वीच प्रकल्प बंद
वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कधी बंद झाला, याबाबत स्पष्टीकरण देताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, मोशीतील दुर्घटना घडण्यापूर्वीच सुमारे दीड महिन्यांपासून प्रकल्प बंद होता. चिमणी पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आणि शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आणखी बिकट बनला.
चिमणीचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न असून, प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे.
“कचऱ्याचा प्रश्न हा केवळ एका डेपोवर अवलंबून राहिल्यामुळे गंभीर झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक झोनमध्ये पर्यायी कचरा प्रक्रिया केंद्र अथवा ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी एका प्रभागातील कचरा दुसऱ्या प्रभागात प्रक्रिया करावा लागू शकतो. ४० वर्षांपासूनची ही समस्या काही दिवसांत सुटणार नाही. त्यामुळे मोशीकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त.






