मुंबई : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होत आहेत. दुसरीकडे राज्यात सगळीकडे पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज गणरायाला निरोप दिले जाणार असून, छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालन्यात देखील गणेश विसर्जन मिरवणुका पाहायला मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने 12 विसर्जन विहिरींसह 4 कृत्रिम तलाव व 47 मूर्ती संकलन केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. तसेच शहरात सुमारे 12 ते 15 महत्वाच्या मोठ्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत.
बीड जिल्ह्यात 1268 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. यासाठी गणेश मंडळांसह प्रशासनही सज्ज झाले आहे. तर, गणेशभक्तांनी संभाव्य धोके ओळखून डीजे व गुलाल टाळावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात देखील आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यंदा 1422 गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना केली. दहा दिवस विविध उपक्रम राबविल्यानंतर आज 1359 सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे.
जालना शहरात श्रींच्या विसर्जन मिरवणूका आज निघणार असून, या मिरवणुकीत मध्यरात्री 12 वाजेपर्यंतच विविध वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मिरवणूक मार्गासह शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, मोती तलाव परिसरात दोन कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले आहेत.
लातूर शहरात आज निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात यंदा जवळपास 1 हजार 284 गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. तर, दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.
नांदेडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासनाने विशेष जय्यत तयारी केली आहे. चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नानकसर गुरुद्वारा झरी आणि पुयनी खदान या ठिकाणी व्यवस्था केली आहे. तसेच सांगवी आणि पासदगाव येथे कृत्रिम तलाव तयार केले आहेत. गोदावरी आणि आसना नदीच्या घाटावर स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
परभणीमध्ये आज होणाऱ्या गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे. यामध्ये जिल्ह्यातील 125 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 81 पोलीस अंमलदारांची नेमणूक केली आहे. सोबतच परजिल्ह्यातून दाखल झालेली एक एसआरपीएफची तुकडी, जिल्ह्यातील 770 होमगार्ड यांची सुद्धा नेमणूक आहे. तर, जिल्ह्यात 1 हजार 882 गणपतीची स्थापना सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली आहे.
धाराशिव शहरात देखील आज मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यंदा शहरात 87 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. यासाठी मुख्य मिरवणूक मार्ग आखून देण्यात आला आहे.