Pantbalekundri Death: महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे निवृत्त सहसचिव आणि प्रशासकीय वर्तुळात ‘पंत’ या नावाने सुपरिचित असलेले ज्येष्ठ अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे सोमवारी (दि. १६ मार्च) ठाणे येथे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिजीत, विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. १७ मार्च) सकाळी ११ वाजता ठाणे येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मंत्रालयातील दोन ‘पंत’ माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात पंतबाळेकुंद्री यांनी मंत्रालयात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्या काळात एक विशेष योगायोग होता — मुख्यमंत्री मनोहर जोशी हेही ‘पंत’ या नावाने ओळखले जात असत. त्यामुळे मंत्रालयात एकाच वेळी दोन प्रभावशाली ‘पंत’ कार्यरत होते आणि त्यांची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा असे. ‘पंतांना विचारा’ हाच अंतिम शब्द नगर विकासाच्या कोणत्याही गुंतागुंतीच्या विषयात ‘पंतांना विचारा’ हा जणू अंतिम निर्णय असे. अगदी राजभवनही याला अपवाद नव्हते. कायद्याचे सखोल ज्ञान आणि निरीच्छ वृत्ती ही त्यांची खरी ताकद होती. ज्या पदावर बसून अमाप संपत्ती मिळवणे सहज शक्य होते, तिथेही पंतांनी आपल्या प्रामाणिकपणाची कास कधीच सोडली नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दाला प्रशासनात एक वेगळेच वजन प्राप्त झाले होते. हेही वाचा – साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर; मराठीतून राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची निवड दिग्गजांनाही त्यांचा आदर नामवंत कायदेतज्ज्ञ रामराव आदिक, शीघ्रकोपी पतंगराव कदम आणि शिस्तप्रिय द. म. सुखटणकर या सर्वांनाच पंतबाळेकुंद्री यांच्या अभ्यासू वृत्तीचा आणि विद्वत्तेचा आदर करावा लागे. मंत्रालयातील कर्मचारी आणि त्या काळातील पत्रकार हे त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. उच्च न्यायालयातही मोठी प्रतिष्ठा केवळ प्रशासनातच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयातही पंतबाळेकुंद्री यांची मोठी प्रतिष्ठा होती. शासनाची बाजू मांडताना त्यांनी एखादा मुद्दा उपस्थित केला की न्यायालय तो सामान्यतः ग्राह्य धरत असे. ही त्यांच्या दीर्घ प्रशासकीय सेवेची आणि निस्पृहतेची सर्वात मोठी पावती होती. पंतबाळेकुंद्री यांनी ‘आत्मभान’ हे छोटेखानी आत्मकथनही लिहिले असून त्यातून त्यांच्या करारी आणि विद्वान व्यक्तिमत्त्वाचा सहज प्रत्यय येतो.