पुणे – “माझा गुरू हरपला, अभिनयातील बाप माणूस’, अभिनय क्षेत्रात अधिराज्य गाजवलेला तो आज शांत झाला, असा भावनिक शब्दात आपल्या लाडक्या मित्राचे, अभिनेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांसह राजकीय, सामाजिक असा विविध क्षेत्रातील चाहत्यांनी बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी गर्दी केली. गोखले यांना पाहताच डोळ्यासमोर उभ्या राहणाऱ्या आठवणींनी रसिकांना अश्रु अनावर झाले.
ज्येष्ठ अभिनेत, दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त डॉक्टरांनी अधिकृतपणे दिल्यावर शनिवारी (दि. 26) दुपारी चार वाजता गोखले यांचे पार्थिक बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी आण्यात येणार आहे, अशी माहिती मिळताच सर्व चाहते आणि रसिकांनी बालगंधर्व परिसरात गर्दी केली. जवळपास दीड तास पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभुमी येथे पार्थिव नेण्यात आले.
दरम्यान, अत्यंदर्शनासाठी माडगूळकर, सुबोध भावे, मेघराज राजेभोले दीपक रेगे, सुनील महाजन, राहुल सोलापूरकर, सतीश आळेकर, संतोष चोरडिया, मिलिंद जसोही, योगेश सुपेकर, मुक्ता बर्वे, जब्बार पटेल, किशोर कदम, मल्हार पाटेकर, शिवराज वाळवेकर, मिलिंद शिंत्रे या कलाकारांनी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
विक्रम गोखले यांचा परिचय –
“विक्रम गोखले’ हे नाव घेताच रंगभूमी, दुरचित्रवाणी आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठावर अधिराज्य गाजवलेला अभिनेता आणि दिर्गदर्शक…पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढयांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले.
विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार होते. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना विजया बाईंकडून मिळाले. “बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या “मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.
विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी 70 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले. रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या “के दिल अभी भरा नही’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत.
अभिनेते विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके, मराठी-हिंदी चित्रपट, मालिका माहिती
* गाजलेली नाटके
“एखादी तरी स्मितरेषा’, “कथा’, “कमला’, “कल्पवृक्ष कन्येसाठी’, “के दिल अभी भरा नहि’, ‘खरं सांगायचं तर’, “छुपे रुस्तम’, “जावई माझा भला’, “दुसरा सामना’, “नकळत सारे घडले’, “पुत्र मानवाचा’, “बॅरिस्टर’, “मकरंद राजाध्यक्ष’, “महासागर’, “मी माझ्या मुलांचा’, “संकेत मीलनाचा’, “समोरच्या घरात’, सरगम’, “स्वामी’ ही त्यांची गाजलेली नाटके होती.
* मराठी चित्रपट
“मॅरेथॉन जिंदगी’, “आघात’, “आधारस्तंभ’, “आम्ही बोलतो मराठी’, “कळत नकळत’, “ज्योतिबाचा नवस’, “दरोडेखोर’, ‘दुसरी गोष्ट’, “दे दणादण’, “नटसम्राट’, “भिंगरी’, “महानंदा’, “माहेरची साडी’, “लपंडाव’, “वजीर’, “वऱ्हाडी आणि वाजंत्री’, “वासुदेव बळवंत फडके’, “सिद्धान्त’ हे गोखले यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत.
* हिंदी चित्रपट
“अकेला’, “अग्निपथ’, ‘अधर्म’, “आंदोलन’, “इन्साफ’, “ईश्वर’, “कैद में है बुलबुल’, “क्रोध’, “खुदा गवाह’, “घर आया मेरा परदेसी’, “चॅंपियन’, “जखमों का हिसाब’, “जजबात’, “जय बाबा अमरनाथ’, “तडीपार’, “तूम बिन’, “थोडासा रूमानी हो जाय’, “धरम संकट’, “परवाना’, “प्रेमबंधन’, “फलक द स्काय’, “बदमाश’, “बलवान’, “मुक्ता’, “यहि है जिंदगी’, “याद रखेगी दुनिया’, “लाईफ पार्टनर’, “लाडला’, “वजीर’, ‘श्याम घनश्याम’, “सती नाग कन्या’, “सलीम लंगडे पे मत रो’, “स्वर्ग नरक’, “हम दिल दे चुके सनम’, “हसते हसते’, “हे राम’ हे हिंदी चित्रपट गाजलेले आहेत.
* दूरचित्रवाणी मालिका
“अकबर बिरबल’, “अग्निहोत्र’, “अल्पविराम’, “उडान’, “कुछ खोया कुछ पाया’, “जीवनसाथी’, “द्विधाता’, “मेरा नाम करेगा रोशन’, “या सुखांनो या’, “विरुद्ध’, “संजीवनी’, “सिंहासन’ या मालिकांमधून गोखले यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.
* मिळालेले पुरस्कार
“अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सन 2013 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)
“विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार’
“बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार
“हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार’
“पुलोत्सव सन्मान’
“चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ या पुरस्कारांनी गोखले यांना चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल गौरवण्यात आले आहे.
लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम
अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. मध्ये त्यांनी “आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होत. 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या “अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला
गेल्या काही महिन्यांपासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला आहे. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत. तसेच सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला होता. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. कलावंतांना उतारवयात हक्काचे ठिकाण असावे, या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि त्यांचे भाचे यांनी काही काळापुर्वी दोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली होती. याठिकाणी मुळशी तालुक्यात नाणे गाव येथील या जागेत वृद्धाश्रम आणि कलाकारांना सादरीकरणासाठी खुला रंगमंच साकारण्यात येणार आहे.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया-
“भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच “विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याच्या निधनाने कला क्षेत्राची हानी झाली आहे.., त्यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. हा वारसा त्यांनी दमदारपणे पुढे नेला. मराठीसोबतच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत, रंगभूमी, दूरचित्रवाणी आपल्या दमदार कामगिरीने आदराचे आणि वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांचीही कलाकाराच्या कलासाधनेत जबाबदारी असते, असं खडसावून सांगणारा सडेतोड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवणारा कलाकार म्हणून ते परिचित होते. या क्षेत्रातील नव्या पिढीला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे एका कलासक्त मार्गदर्शकाची निश्चितच उणीव भासत राहील, ही कला क्षेत्राची हानीच आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
“मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलातही अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षणासाठी त्यांचा पुढाकार असायचा. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणाऱ्या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणाऱ्या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
“ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दुरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला.अभिनय कौशल्य व अनोख्या संवादशैलीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. 50 वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करत सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
– शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री
“हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”
– छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार
“ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालत बोलत विद्यापीठ हरपल. मराठी रंगभूमीच नव्हे तर चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले. आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केल. अभिनय क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांसाठी ते चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे कधीही भरुन निघणार नाही असे नुकसान झाले आहे. त्यांची संवादशैली ही प्रत्येकालाच प्रभावित करणारी होती. “वजीर’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात कायम आहे.”
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री
“विक्रम गोखले गेले विश्वास बसत नाही. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असत, एक कसदार राजबिंडे अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते. पण दुर्दैव. या महान अभिनेत्याला आदरांजली.”
– उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
“रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात विक्रम गोखले यांनी या तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेक उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमाल होती. राजकीय भूमिका घेताना ते कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला.”
– राज ठाकरे, पक्षप्रमुख मनसे
“माझ्या आयुष्यातला मोठा आधार गेला. ज्यांच्याकडे बघत मी अभिनय शिकलो. या क्षेत्रात कसे वागावे हे शिकलो. आपल्या मतांवर ठाम कसे राहावे हे शिकलो. असा माझा सर्वच बाबतीतला तो गुरू होता. खऱ्या अर्थाने रंगभूमीवरचा केवळ दिसायलाच नाही तर अभिनयातही देखणा कलाकार गेला. स्टेजवर कसे काम करावे, कसे बोलावे, कसे वावरावे हे शिकवणारा अफाट अभिनेता होता तो. माझ्या आयुष्यातली ही पोकळी कधीच भरून न निघणारी आहे. माझा पहिला गुरू यशवंत दत्त गेला आणि हा दुसरा गुरूही गेला.”
– शरद पोंक्षे, प्रसिध्द अभिनेते
“विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो, असेन…तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही.., भावपूर्ण श्रध्दांजली..!”
– नाना पाटेकर, अभिनेते
“विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील! जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता कॅमेराला डबल लूक देईल.
जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून पानभर संवाद बोलला जाईल, जेव्हा जेव्हा घेतलेल्या पॉज मधूनही
अचूक अर्थ पोहोचवला जाईल, जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील, जेव्हा जेव्हा “बिटवीन द लाईन’ संवादापेक्षा अधोरेखित होईल..भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात निर्भीड भूमिका मांडली जाईल.. तेव्हा तेव्हा विक्रमकाका तुमची उणीव भासत राहील!!!”
– डॉ. अमोल कोल्हे, अभिनेते
हेही वाचा –
माझा हा दुसरा गुरूही गेला; अभिनेते शरद पोंक्षे शोकाकुल
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी
Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेत्याचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर चाहत्यांना अश्रू अनावर
विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले – देवेंद्र फडणवीस
लाईव्ह व्हिडीओ –