नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्यातर्फे पुर्ण मदत आणि सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
गाझीपुर सीमेवर शेतकऱ्यांची वीज व पाणी पुरवठा तोडण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी त्रासात आहेत त्यांना मदत करा अशी विनंती करणारा संदेश शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी केजरीवाल यांना उद्देशून पाठवला होता. त्याला प्रतिसाद देताना केजरीवालांनी नमूद केले की मी माझ्यावतीने आणि माझ्या सरकारच्यावतीने शेतकऱ्यांच्या तेथील अडचणी दूर करण्यासाठी सर्व शक्यती मदत देईन.
त्यानुसार केजरीवालांनी तेथे पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत केला त्याबद्दल टिकैत यांनी केजरीवालांचे आभारही मानले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गाझीपुर सीमेवर जाऊन तेथील अडचणींची माहिती घेतली व तेथील व्यवस्था सुरळीत केली.