Fruit Market – युध्दामुळे आखाती देशांकडील मागणीत झालेली घट, त्यातच अवकाळी पावसाच्या फटक्याचा कलिंगड, खरबुजाच्या विक्रीवर झाला आहे. एकीकडे आवक चांगली होत असताना ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात चार दिवसात कलिंगडाच्या भावात किलोमागे ५ रुपये, तर खरबुजाच्या भावात ७ रुपयांनी घट झाल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली. घसरत्या दरांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन, वाहतुक खर्च निघणेही अवघड झाले आहे. ऊन्हाळ्यात कलिंगड, खरबुजला मोठी मागणी असते. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. गुरूवारी (दि.२) पाऊसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. घाऊक बाजारात चार दिवसांपूर्वी किलोला दर्जानुसार १० ते १५ रुपये भाव मिळणाऱ्या कलिंगडाला आता किलोला ७ ते १० रुपये भाव मिळत आहे. किलोला २० ते २२ रुपये भाव मिळणाऱ्या खरबुजाला आता १० ते १५ रुपये भाव मिळत आहे. जिल्ह्यासह अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातून दोन्ही फळांची आवक होत आहे. कलिंगडाची दररोज ५० ते ६० टन, तर खरबुजाची ३० टन आवक होते. “ऊन्हाळ्यात कलिंगड, खरबुज विक्रीतून शेतकऱ्यांना फायदा होत असतो. मात्र, चांगली आवक होत असताना अवकाळी पावसामुळे मालाला उठाव नाही. त्यामुळे भावात घसरण झाली आहे. अवकाळी पाऊस थांबताच दोन्ही फळांना मागणी वाढेल.” – पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केट यार्ड