Top 10 News : राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा भाजपला पाठिंबा ते इथेनॉल इंधनाला केंद्राची मंजुरी…; वाचा आजच्या १० टॉप बातम्या
Top 10 News : Top 10 News : राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा भाजपला पाठिंबा ते इथेनॉल इंधनाला केंद्राची मंजुरी...; वाचा आजच्या १० टॉप बातम्या

Top 10 News : १) राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा भाजपला पाठिंबा; कारवाई होणार?
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या तीन आमदारांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांना पक्षाच्या उमेदवारासोबत राहण्याच्या सूचना दिल्याचेही स्पष्ट केले. अंतिम निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये उत्तमराव जानकर, अभिजीत पाटील आणि नारायण पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे या तिघांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२) लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात; दोन दिवसांत 6 जणांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाल्याने खळबळ उडालीय. लातूर-तुळजापूर महामार्गावरील बुधोडापाटीजवळ मध्यरात्री कार आणि जीपची जोरदार धडक होऊन तिघांचा मृत्यू, तर 17 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव कारने जीपला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांपैकी तिघेही धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी लातूर-नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटीजवळ कंटेनर, कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तीन जणांचा मृत्यू झाला होता. अवघ्या दोन दिवसांत लातूर जिल्ह्यातील दोन भीषण अपघातांत सहा जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून दोन्ही घटनांचा पुढील तपास सुरू आहे.
३) प्रसिद्ध इन्फ्लुएंसर प्रेम भाटीचा भीषण अपघातात मृत्यू
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रेम भाटी याचा कल्याणजवळ दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. पत्नीला माहेरी सोडून घरी परतत असताना घरापासून काही अंतरावर त्याची दुचाकी रस्त्यावर पडलेल्या खडीवर घसरली. अपघातापूर्वी वडिलांनी फोन केल्यावर “10 मिनिटांत घरी पोहोचतो,” असे प्रेमने सांगितले होते. मात्र काही क्षणांतच त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी आली. गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रेम भाटीचे इन्स्टाग्रामवर 83 हजार, तर यूट्यूबवर सुमारे 30 लाख सबस्क्राइबर्स होते.
४) तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करा; मनोज जरांगे यांचा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. “सरकारने तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करावेत. ते उत्तम काम करत असून भेसळखोरांवर कठोर कारवाई करत आहेत. त्यांच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा आम्ही सरकारच्या मागे लागू,” असे जरांगे म्हणाले. अन्नातील भेसळ रोखल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि दुधातील भेसळ थांबल्यास शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी एफडीएमध्ये रुजू झाल्यानंतर भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्यांच्या कामाचे राज्यभर कौतुक होत आहे.
५) 100 टक्के इथेनॉल इंधनाला केंद्राची मंजुरी; नितीन गडकरींची मोठी घोषणा
केंद्र सरकारने इथेनॉल इंधनासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 टक्के इथेनॉल (E100) इंधनाच्या कायदेशीर वापरास मंजुरी देणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे फ्लेक्स-फ्यूल तंत्रज्ञान असलेल्या वाहनांना E100 इंधन वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने यापूर्वीच पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वेळेआधी पूर्ण केले होते. या नव्या धोरणामुळे कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होऊन देशाची मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
६) राम मंदिर देणगी प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीप्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली आहे. तपासादरम्यान दानपेटीतील रक्कम मोजण्याचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या घरातील शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवलेली सुमारे 10 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणानंतर समाजवादी पक्षाने देणगीतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सर्व व्यवहारांचे नियमित लेखापरीक्षण सुरू असल्याचा दावा करत कोणतीही अनियमितता सिद्ध झालेली नसल्याचे म्हटले आहे. आता एसआयटीच्या तपासातून नेमके सत्य काय, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
७) अमेरिकेची मोठी घोषणा! आजच युद्धविराम कराराची शक्यता
अमेरिका-इराण संघर्ष संपण्याच्या दिशेने महत्त्वाची घडामोड घडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करार होऊ शकतो, असा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल आणि पुढील शांतता प्रक्रियेला वेग मिळेल. मात्र, इराणकडून अद्याप कराराबाबत अंतिम अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. इराणी अधिकाऱ्यांनी चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले असले तरी अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घडामोडींवर जगभराचे लक्ष लागले असून, करार झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
८) इंटरनेटशिवाय पाहता येणार Live TV; जगातील पहिला फोन लवकरच बाजारात
भारतात मोबाईल तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडवणारा जगातील पहिला D2M (Direct-to-Mobile) फीचर फोन लवकरच बाजारात येणार आहे. खुशटेक कोरिया कंपनीने विकसित केलेल्या या फोनमध्ये इंटरनेट, मोबाईल डेटा किंवा Wi-Fi शिवाय मोफत लाईव्ह टीव्ही पाहता येणार आहे. यासाठी फोनमध्ये इन-बिल्ट अँटेना आणि ATSC 3.0 तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 2.4 इंचाचा डिस्प्ले, 2G/4G सपोर्ट, 1800mAh बॅटरी, USB Type-C चार्जिंग, Bluetooth 5.0 आणि FM रेडिओ अशी वैशिष्ट्ये या फोनमध्ये असतील. कॉलिंग, डिजिटल पेमेंट आणि लाईव्ह टीव्ही अॅप्सही उपलब्ध असतील. सध्या हा फोन उत्पादनाच्या टप्प्यात असून लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
०९) महिलांच्या बाबतीत आमिरची पसंती भन्नाट
‘लगान’ चित्रपटाच्या 25 वर्षांच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात अभिनेत्री काजोलने अभिनेता आमिर खानची मिश्कील शैलीत फिरकी घेतली. “आमिर खान प्रॉडक्शन्सने उत्तम चित्रपट दिलेच, पण महिलांच्या बाबतीतही आमिरची निवड उत्कृष्ट आहे,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी आमिरची माजी पत्नी किरण रावही मंचावर उपस्थित होती. अभिनेत्री जूही चावलानेही आमिरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगत त्याची हलक्याफुलक्या अंदाजात चेष्टा केली. या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याचीही पुन्हा चर्चा रंगली असून तो लवकरच गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाह करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
१०) मुंबई टी-२० लीगच्या फायनलमध्ये हाय-वोल्टेज ड्रामा
१३ जून रोजी खेळल्या गेलेल्या मुंबई टी-२० लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात खेळाडूंमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. १९ व्या षटकात एआरसीएस अंधेरीचा फलंदाज गौरव जाथर बाद झाल्यानंतर, मराठा रॉयल्सच्या खेळाडूंनी आक्रमक जल्लोष केला. यावरून गौरव जाथर आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांच्यात मैदानातच जोरदार शाब्दिक वाद झाला. यानंतर सामना संपत आला असताना मराठा रॉयल्सचा एक खेळाडू थेट अंधेरीच्या डगआऊटपाशी गेला, जिथे कर्णधार शिवम दुबे बसला होता. तिथे पुन्हा खेळाडूंमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. या सामन्यात मराठा रॉयल्सने ८ धावांनी विजय मिळवून ट्रॉफी जिंकली असली, तरी या असभ्य वर्तनामुळे ‘एमसीए’ खेळाडूंवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.





